कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय थंडबस्त्यात निसर्गातील जैवविविधता आणि अन्नसाखळी कायम राखण्याकरिता इतर जीवांप्रमाणेच चिमण्यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची आहे. मात्र, पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने त्यांची संख्या कमी झाली. त्यामुळेच गतवर्षी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिमण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. आता वर्ष लोटले तरी या केंद्राबाबत काहीही हालचाली झालेल्या नाहीत. मुनगंटीवार यांनी केंद्राची घोषणा केल्यानंतर त्यासाठी पहिला टप्पा निश्चित केला. यात शहरातील सेमिनरी हिल्ससह संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, रामबाग वन वसाहत चंद्रपूर, वनवसाहत औरंगाबाद या ठिकाणांची निवड करण्यात आली. तेथे चिमण्यांच्या आढळण्याबाबत सर्वेक्षण करणे, कृत्रिम घरटी बसवणे, वळचणी उपलब्ध करणे, पक्ष्यांवर काम करणाऱ्या बीएनएचएस किंवा इतर तज्ज्ञ यंत्रणांशी सल्लामसलत करुन चिमण्यांना खाद्य उपलब्ध करुन देणे, घरटय़ांसाठी जागा मिळावी म्हणून माती, जैविक कुंपण तसेच गवत उपलब्ध करणे आदी उपाययोजना करण्याचे देखील निश्चित झालै. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती करणे तसेच कृत्रिम घरटी उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावरसुद्धा भर देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मिलन काळात चिमण्या मातीत आंघोळ करतात. त्यामुळे वरील उपाययोजनांचा परिणाम जाणून घेण्याच्या दृष्टीने नियमितपणे चिमण्यांच्या संख्येवर संनियंत्रण करण्यावर भर देणे अशा अनेक उपाययोजना, सूचना त्यांनी केल्या होत्या. हा टप्पा यशस्वी झाला तर इतर ठिकाणी त्याची पुनरावृत्ती करण्यात येईल. अपेक्षित परिणाम प्राप्त झाला नाही तर कृत्रिम प्रजननाचा अवलंब करावा लागेल. त्याअंतर्गत अंडी उबवणे, प्रजनन आदी उपक्रमांचा समावेश राहील. याकरिता केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधीकरण आणि केंद्रीय वन्यजीव मंडळांची परवानगी घेण्यात येईल, असेही वनमंत्र्यांनी सांगितले. मात्र, गेल्या वर्षभरात पहिल्याच टप्प्याबाबत काहीही हालचाली झालेल्या नाहीत, त्यामुळे दुसरा टप्पा सुरू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अनेक घोषणांच्या जंत्रीत ही घोषणाही फक्त घोषणाच ठरणार नाही ना? असा सवाल पक्षीप्रेमींकडून केला जात आहे. यासंदर्भात वनमंत्र्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते अधिवेशनात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या कृत्रीम प्रजननाकरिता औरंगाबादचे पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांनी विरोध दर्शवला होता. कृत्रिम प्रजननाकरिता चिमणी म्हणजे पशू नव्हे. कृत्रिम प्रजननात जिथे प्राण्यांच्या जिविताचीच हमी देता येत नाही, तेथे हा चिमुकला पक्षी कसा वाचणार, असा प्रश्न त्यांनी या घोषणनेंतर लोकसत्ताशी बोलताना उपस्थित केला होता. संख्येत घट (आज ‘स्पॅरो डे’) चिमण्यांच्या नष्ट होण्यामागे भ्रमणध्वनी मनोरा आणि त्यातून निघणारी किरणे हे एकच कारण समोर केले जाते. प्रत्यक्षात आधुनिकतेचा हव्यास चिमण्या नष्ट होण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. बांधकामांमुळे चिमण्यांचा अधिवास सुरक्षीत राखायला हवा. झाडे तोडण्याला प्रतिबंध करायला हवा. मिलन काळात चिमण्या मातीत आंघोळ करतात. त्या मातीची जागा आता सिमेंटने घेतल्याने मिलनात अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, चिमण्यांची संख्या कमी होत आहेत.