बिहार विजयाचा जल्लोष करताना नियमभंग; महापौर, आयुक्तांच्या सूचना पायदळी

नागपूर : करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता  महापौर संदीप जोशी आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी शहरातील नागरिकांना फटाके फोडू नये, असे आवाहन केले आहे. परंतु सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने  बिहार निवडणुकीचा जल्लोष  करताना वर्दळीच्या परिसरात आतषबाजीचा अतिरेक के ला. या परिसरात रुग्णालय आहे, याचाही विसर कार्यकर्त्यांना पडला होता. त्यामुळे  महापालिका आयुक्त आता भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सध्या शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाकडूनच व्यक्त करण्यात आली आहे.  फटाक्याच्या धुरामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे, त्यामुळे नागरिकांनी सजग राहावे, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी आणि आयुक्तांनी के ले. मंगळवारी यासंदर्भात महापालिके ने आदेशही जारी के ले होते. मात्र एक दिवस जात नाही तोच  शुक्रवारी तलाव परिसरातील भाजप कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी बिहारसह  इतर राज्यात पक्षाला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करताना मोठय़ा प्रमाणात फटाके  फोडले. मोठय़ा आवाजातील या फटाक्यांमुळे आणि त्यामुळे झालेल्या धुरामुळे परिसर प्रदूषित झाला.

विशेष म्हणजे, यावेळी पक्षाचे शहर अध्यक्षांसह आमदार, खासदार व पदाधिकारी  उपस्थित होते. त्यांच्यासमोर हा प्रकार घडला. यातील कोणीही कार्यकर्त्यांना आवरण्याचा  प्रयत्न के ला नाही. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

एकीकडे शहरात भाजपकडून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात असताना पक्षाचेच कार्यकर्ते  या आवाहनाकडे पाठ फिरवत असल्याचे विरोधाभासी चित्र यानिमित्ताने दिसून  आले. दुसरीकडे सामाजिक अंतर

राखण्याचे आणि मुखपट्टय़ा लावण्याच्या नियमालाही यावेळी फाटा देण्यात आला. यावेळी खासदार विकास महात्मे, आमदर मोहन मते, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, दयांशकर तिवारी, बंडू राऊत, संजय बंगाले, चेतना टांक, किशोर पालांदूरकर, प्रगती पाटील, विनोद कन्हेरे, संजय वाधवानी, चंदन गोस्वामी, किसन गावंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमच्याकडून चूक झाली

कार्यकर्त्यांनी मोठय़ा  प्रमाणात फटाके  आणले होते. आम्ही त्यांना ते न फोडण्याची विनंती के ली. मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहापुढे आम्ही काहीच करू शकलो नाही. आमच्याकडून ही चूक झाली. पुढे ती टाळली जाईल.

– विकास कुंभारे, आमदार, भाजप.

समाजात चुकीचा संदेश जाईल

महापालिके त सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपकडून हे अपेक्षित नाही. पक्षाच्या आजच्या कृतीमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल. नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक भान राखणे आवश्यक आहे.

– रवींद्र भुसारी, कार्यकर्ते, फटाके मुक्त अभियान.