स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर जशी काँग्रेसमध्ये विभागणी झाली तशीच विभागणी भाजपमध्ये होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे सरकार लक्ष देणार नसेल तर आपण राजीनामा देऊ, असा इशारा काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी दिला आहे.
काटोल तालुक्यातील कोंढाळी येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ विदर्भवादी नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांना निमंत्रित करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या म्हणून मी वेळोवेळी आवाज उठविला, मात्र सरकार त्यादिशेने पावले उचलत नाही, विदर्भावरील हा अन्याय दूर करायचा असेल तर स्वतंत्र राज्याशिवाय पर्याय नाही, सरकारने या मुद्दय़ाकडे लक्ष दिले नाही तर आपण राजीनामा देऊन बाहेर पडू, असा इशाराही यावेळी देशमुख यांनी दिला. आपल्या निर्णयास अ‍ॅड. अणे यांची साथ असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे स्वतंत्र राज्याची मागणी केल्यामुळे अणे यांना त्यांचे पद सोडावे लागले, अणेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणाऱ्यांमध्ये भाजपही होता,