माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गूढ मौन नागपूर : कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी शासकीय बैठकीत अपमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेस नेत्यांशी वाद घातला. या वादात काँग्रेस नेते सुरेश भोयर यांच्या बाजूने उभे राहिले. परंतु, प्रत्येक लहान-सहान प्रकरणात पक्षाची बाजू मांडणारे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र गूढ मौन बाळगल्याने सावरकर एकाकी पडल्याचे चित्र आहे. मंत्री सुनील केदार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सन्मान मिळाला नसल्याचे आमदार सावरकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी भांडण झाले. पण, माजी मंत्री बावनकुळे यांनी सावरकर यांची पाठराखण करण्याचे टाळले आहे. ते आज पत्रकार परिषेदलाही अनुपस्थित राहिले. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपने बावनकुळे यांची विधानसभेची उमेदवारी नाकारली आणि सावरकर यांची लॉटरी लागली. राज्याचे ऊर्जावान मंत्री म्हणून बावनकुळे यांची मागील पाच वर्षे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने स्तुती करत राहिले. परंतु, ऐनवेळी त्याचे तिकीट कापण्यात आले. त्यामुळे बावनकुळे यांनी जोरदार धक्का बसला. त्यातून ते अजूनही सावरल्याचे दिसत नाही. ते पक्षावरही नाराज आहेत. परंतु त्यांचा नाईलाज आहे. त्यातून त्यांची प्रचंड राजकीय कोडी झाली आहे. तरी ते अधून-मधून पत्रकार परिषद घेऊन आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सावरकर यांच्या भांडणाची ध्वनीफित सर्वत्र प्रसारित झाली आणि जिल्ह्यातील राजकारण तापले. या मानापमान नाट्यावरून काँग्रेसमध्ये एकजूट दिसली. पण सावरकर हे एकटे पडल्याचे चित्र आहे. एरवी भाजप आपल्या आमदार, खासदार किंवा पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी मोठी शक्ती उभी करते. वरिष्ठ नेते, प्रचारतंत्र सर्वच पणाला लावून विरोधकांना नामोहरम केले जाते. परंतु, या प्रकरणात सावरकर यांच्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धावून आल्याचे दिसले नाही. बावनकुळे यांनी याप्रकरणापासून स्वतङ्मला अलिप्त ठेवल्याचे दिसून येत आहे. काँग्रेससोबतच्या भांडणात पडून सावकर यांचे महत्त्व वाढू नये, या धोरणातून तर बावनकुळे यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला नसावा ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.