नितीन राऊत यांचे टीकास्त्र

खोटी स्वप्ने दाखवण्यात भाजपचा हातखंडा आहे. परंतु आता त्यांच्या भूलथापा जनतेला कळू लागल्या असून असंतोष निर्माण होऊ लागला आहे, असे माजी मंत्री नितीन राऊत म्हणाले.
लोकसत्ता कार्यालयाला राऊत यांनी शुक्रवारी सदिच्छा भेटी दिली. यावेळी त्यांनी नागपूरसह विदर्भात काँग्रेसचे बळ वाढवण्यासंदर्भातील प्रयत्न, महापालिका निवडणुका आणि विदर्भासह इतर मुद्दय़ांवरून भाजपचे घुमजाव आदी विषयांवर चर्चा केली.
भाजप सरकारचे एका वर्षांचे काम बघल्यानंतर लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. एकही नवीन योजना या सरकारची नाही. जुन्या योजनांना नवीन नाव देऊन राबवण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना हा तसाच प्रकार आहे. काँग्रेसच्या काळात सिमेंट बंधारे योजना होती. त्या योजनेचे नाव बदलण्यात आले आहे. मी पालकमंत्री असताना ‘वर्ल्ड क्लास सिटी’ची संकल्पना मांडली होती.
आता हे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून सांगत आहेत. त्या संदर्भात शहरातील लोकांकडून माहिती भरून घेत आहेत. परंतु महापालिकेची ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना काय, याबाबत बोलले जात नाही. गेल्या दहा वर्षांत महापालिकेच्या तिजोरीला भगदाड पाडण्याचे काम भाजपने केले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट अशी महापालिकेची अवस्था झाली असून खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे हात पसरण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
विरोधी पक्षात असताना गडकरी ‘मिहानमधील रोजगाराच्या संधी’ या विषयावर सादरीकरण देत होते. आता राज्यात आणि केंद्रात त्यांचे सरकार आहे. गेल्या वर्षभरात विदर्भातील किती युवक-युवतींना नोकऱ्या दिल्या, असा सवालही त्यांनी केला. सत्तेत आल्यास वेगळा विदर्भ करणार असल्याचे सांगत होते. बहुमत असताना त्याबाबत गप्प बसले आहेत. कोणत्या मुहुर्ताची वाट बघत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या सरकारला आश्वासन पूर्तीचा लेखाजोखा द्यावा लागणार आहे. काँग्रेसला प्रमुख विरोध पक्ष म्हणून भाजप सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याची संधी आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, बरोजगारीची समस्या आणखी भीषण झाली आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक होत आहेत. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाल्यास शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना संधी मिळतील. शेतावरील भार कमी होईल आणि त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते. या मुद्दय़ांवरून देखील सरकारची कोंडी केली जाईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेसला सावरायला वेळ लागेल
काँग्रेसला विरोधी पक्षात बसल्यानंतर चिंतन करण्याची संधी मिळाली. काँग्रेसला सावरण्यासाठी थोडा वेळ जरूर लागेल. परंतु पहिल्यापेक्षा अधिक सक्षमपणे जनहितासाठी उभे राहण्यासाठी हा पक्ष सज्ज होईल यात शंका नाही. ठेच लागल्यानंतर माणूस शहाणा होत असतो. काँग्रेसला कायम विदर्भाने साथ दिली आहे. यावेळी विदर्भातील बळ कमी झाल्याने पक्षाचे हे दिवस बघावे लागले याची जाणीव आहे. हा गड परत मिळण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विदर्भाचा दौरा करणार आहेत. लोकांपर्यंत जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. विविध पातळीवर बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन सुरू आहे, असेही ते म्हणाले.
महापालिका निवडणूक एकत्र लढणार
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि मी शहरात काँग्रेसला गतवैभव्य प्राप्त करून देण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्यातील सर्व मतभेद दूर झाले आहेत. एका वर्षांवर असलेली निवडणूक एकजुटीने लढणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखे विरोधक शहरात असल्याने शक्तीपेक्षा युक्तीने त्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी येत्या काही दिवसात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून योजना तयार करणार आहोत.