खासगी इंग्रजी शाळा आणि सीबीएसई शाळांकडून पालकांची पुस्तकाच्या नावाखाली होणारी लूट राजरोस सुरू असून त्या विरोधात पालक ‘ब्र’ देखील उच्चारू शकत नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागत असल्याच्या पालकांच्या तीव्र भावना आहेत. आजच्या काळात असे म्हटले जाते की, बाळ आईच्या पोटात असल्यापासूनच त्याला कुठल्या शाळेत घालायचे याचे आडाखे बांधले जातात. अगदी नर्सरीत घालण्यापासून मुलांच्या शाळांचा शोध घेत पालक वणवण भटकतात. कितीही देणगी असेल तेवढी मोजतात आणि सीबीएसई किंवा इंग्रजी शाळांत घालतात. केवळ प्रवेश शुल्क भरूनच चालत नाही तर त्यानंतर सर्व प्रकारचे साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याचे बंधनही पालकांवर घातले जातात. सीबीएसई किंवा इंग्रजी शाळांचे वेड केवळ शहरापुरताच मर्यादित नाही, त्याचे ग्रामीण भागातही लोण पसरले असल्याने त्याठिकाणी शालेय साहित्याच्या नावाने होणारी लूट कमी नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आब आणत विद्यार्थ्यांच्या आडून पालकांकडून पैसे उकळले जातात. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (एनसीईआरटी) एनसीईआरटीची पुस्तके अगदी स्पर्धा परीक्षांसाठीही उपयोगी पडतात. त्यांची पुस्तके स्वस्त दरात आणि चांगल्या दर्जाची आहेत. शिवाय किमतीही कमी आहेत. मात्र तीच पुस्तके खासगी व सीबीएसई आणि मराठी शाळा सोडून इतर मंडळांच्या शाळांमध्ये अव्वाच्या सव्वा भावात मिळत आहेत. एनसीईआरटीची पहिली ते पाचवीचा पूर्ण संच ४०० रुपयांना आहे. त्यात पाच पुस्तकांचा समावेश आहे. तिसरी ते पाचवीचे जवळपास तीन पुस्तकांचा संच २४० रुपयांमध्ये आहे. सहावी ते दहावीचे विज्ञान पुस्तक ६०० रुपयांना आहेत. हिंदी माध्यमाचे ५४५ रुपयांमध्ये तर सहावी ते दहावीचे गणिताचा पाच पुस्तकांचा संच ५७५ रुपयांना मिळतो. सहावी ते बारावी गणिताच्या आठ पुस्तकांचा संच १,०९० रुपयांना मिळतो आणि हिंदी माध्यमातून याच विषयाची पुस्तके तेवढय़ाच म्हणजे १,०९० रुपयांना आहेत. एनसीईआरटीचे गणित, इतिहास, भूगोल.. अशी सर्वच पुस्तके माफक दरात उपलब्ध आहेत. याच्या अगती दहापट किंमत सीबीएसई शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या खासगी प्रकाशकांच्या पुस्तकांची आहे. सामान्यत: सीबीएसई शाळांमध्ये एस.चांद, दिल्ली पब्लिकेशन, नवनीतने प्रकाशित केलेली पुस्तके विकली जातात. मुलांना एनसीईआरटीची पुस्तके द्यावीत, असे शासनाचे, सीबीएसईचे आणि येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाचेही म्हणणे आहे. मात्र, शाळा देत नाहीत. त्यात दोष पालकांचाच आहे. कारण अशा महागडय़ा शाळांमध्ये मुलांना दाखल करण्याचा आग्रह पालकांनाच अधिक आहे. सीबीएसई शाळांमध्येही जाऊन विद्यार्थी काय दिवे लावतात. आता जर जेईईचा निकाल पाहिला तर गेल्यावर्षी १३६वर असलेला कट ऑफ ८१वर आलाय. याचे कारण विद्यार्थ्यांना सामान्य संकल्पना नीट कळत नाहीत किंवा त्या शिकवल्या जात नाहीत. सीबीएसई शाळांमध्ये जाऊनही विद्यार्थी लाखो रुपयांचे खासगी शिकवणी वर्ग लावतातच. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे खूप महागडी पुस्तके खरेदी केली म्हणजेच मिळते, असे अजिबात नाही. रवि फडणवीस, अध्यक्ष, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ