राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून साकारलेल्या चंद्रपूर-मुल मार्गावरील चीचपल्ली येथील बांबू रिसर्च सेंटरला आज दुपारी अचानक आग लागली.

या आगीत बांबू सेंटरची बांबूपासून तयार इमारत पूर्णतः जळून राख झाली. यात कुठलीही मनुष्य हानी झाली नसली तरी करोडो रुपये खर्च करून केवळ बांबूचा उपयोग करून उभारलेली हि इमारत जळून राख झाली आहे.

पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणाधीन इमारतीला आज दुपारच्या सुमारास आग लागली. ही इमारत बांबूपासून बनवण्यात येत होती. आग कशामुळे लागली व सुरक्षेसाठी काय खबरदारी म्हणून काय उपाययोजना आखण्यात आल्या होत्या यासह इतर बांबींची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यंत्रणेला दिले आहेत. दरम्यान आगीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देवून पाहणी केली. आगीत कोणतीही जीवीत हाणी झाली नसून सुमारे 9 ते 10 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.