नागपूर येथील भाजपाच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेतले. भाजपाने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले असून काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केल्याची टीका त्यांनी केली. भाजपा सरकारमुळे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत असून २०२० ला हे स्मारक पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही. मात्र, भाजपाचे सरकार सत्तेवर येताच स्मारकाला जागा तर मिळालीच शिवाय मोठ्या प्रमाणात निधीही मिळाला. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही. काँग्रेसने अनूसूचित जातीचा फक्त वापरच केला, असा आरोप त्यांनी केला.

फडणवीस यांनी यावेळी विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाआघाडीलाही लक्ष्य केले. हे सर्व पक्ष परिवाराचे पक्ष आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्यांना सत्तेत बसवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबीतून आलेले आहेत. त्यांना गरिबांचे दु:ख माहीत आहे. मोदींनी उज्वला योजनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत गॅस नेला. प्रत्येकाच्या घरी वीज पोहोचवण्यात आली, असे ते म्हणाले.

मोदींमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. इंदू मिल प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी तीन दिवसांत जागा देण्याचे आदेश दिले. निधीही मोठ्याप्रमाणात दिला. २०२० पर्यंत इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहील. भाजपा सरकारने नेहमी वंचित आणि गरिबांसाठी काम केले आहे. हे सरकार सामाजिक न्यायाच्या मार्गावर जाणारे आहे. बाबासाहेबांच्या नावाने ते मत मागतात. पण त्यांना सुविधा देत नाहीत, असा काँग्रेसवर त्यांनी आरोप केला.

ज्यावेळी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी करण्यात आली. त्यावेळी केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार होते. पण त्यांनी हा प्रश्न मार्गी लावलाच नाही. त्यांची या जागेवर नजर होती. काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:च्या आई-बापांची स्मारके उभा केली. त्यांना अनुसूचित जातीचा फक्त मतांसाठीच वापर केला, असेही ते म्हणाले.