अशोक चव्हाण यांचा हिरवा कंदील

मतभेत विसरून पक्षासाठी एकत्र आल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी, या नेत्यांकडून नावे निश्चित होत नसल्याने शहर काँग्रेस कार्यकारिणी आणि इतर आघाडय़ांचे अध्यक्ष नियुक्त करण्यास विलंब होत असल्याचे दिसून आले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी देखील कार्यकारिणी, ब्लॉक अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि विविध आघाडय़ांच्या अध्यक्षांची नियुक्तीचे प्रयत्न झाले. परंतु तत्कालिन प्रदेशाध्यक्षांकडून सत्कारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय लोकसभेपाठोपाठ विधानसभेत झालेल्या पराभवातून सावरण्यात वेळ गेला. यामुळे शहराध्यक्ष बदलला पण कार्यकारिणी जुनीच, असे चित्र गेल्या दीड वर्षांपासून आहे. संघटन पातळीवर नवीन लोकांना संधी देऊन मरगळ झटकण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहरात आवश्यक संघटनात्मक फेरबदल करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर अंतिम यादी चव्हाण याकडे सादर केली जाणार आहे.

तत्पूर्वी स्थानिक नेत्यांकडून त्यांच्या पसंतीची नावे मागवण्यात येणार आहेत. स्थानिक नेत्यांनी स्वत:हून कार्यकारिणीसाठी किंवा ब्लॉक अध्यक्षांसाठी नावे देणे अपेक्षित होते. परंतु त्यांच्याकडून नावे सुचवण्यात आलेली नाही. संघटनात्मक पातळीवरील शिथिलता दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी काही उपाय सुचविले असून, स्थानिक नेत्यांशी चर्चा करून शहराध्यक्ष यादी निश्चित करतील, असे सूत्रांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काही स्थानिक नेत्यांची नागपुरातील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये अलिकडे बैठक झाली. यावेळी दिवाळीनंतर शहर काँग्रेसमध्ये फटाके फोडण्याची रणनीती आखण्यात आली आहे. संघटनेतील फेरबदलात स्थानिक नेत्यांना डालवण्यात येणार नसेल तरी गेल्या वर्षभरात सक्रिय नसलेल्यांना डच्चू देण्याचे निश्चित झाले आहे. राज्यात आणि केंद्रातही सत्ता नसल्याने पक्षाच्या तिजोरीत खणखणाट असून, कार्यकर्त्यांच्या भरवशावर पक्ष बांधणीचा कार्यक्रम रेटण्यात येत आहे. अशा अवस्थेत आगामी महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.

शहरातील अध्यक्ष बदलले पण सध्या माजी शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांची कार्यकारिणी कार्यरत आहे. ब्लॉक अध्यक्ष देखील त्यावेळेचेच आहेत. यातील काही पक्ष सोडून गेले आणि एका अध्यक्षाचे निधन झाले. शहरात वॉर्ड अध्यक्ष नेमण्यात आलेले नाहीत. यामुळे अशोक चव्हाण यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर हवे तसे चैतन्य शहर काँग्रेसमध्ये दिसून येत नाही. शहराध्यक्षांना सर्व पातळीवर बदल हवे असून, त्यांना सर्व संमतीने पुढे जाण्याचा सल्ला प्रदेशाध्यक्षांकडून मिळाला आहे.

महिला आघाडी, युवक काँग्रेस आणि सेवादल वगळता इतर आघाडय़ा सक्रिय असल्याचे दिसून येत नाही. संघटनेतील बदल आणि आघाडय़ांच्या अध्यक्षांच्या नियुक्तीसोबत त्यांना कार्यक्रम द्यावा लागणार आहे. कार्यक्रम नसणे आणि आघाडय़ांच्या कामाचे मूल्यांकन होत नसल्याने आघाडी अध्यक्ष ‘लेटर हेड’ पर्यंत मर्यादित राहिले, असे एका स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.