डिजिटल इंडियाच्या कामाचे देयक थकले; बीएसएनएलच्या चार अधिकाऱ्यांवर आरोप

डिजिटल इंडिया अंतर्गत केबल टाकण्याचे काम केल्यानंतर वर्षभरापासून भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल)  जवळपास ९० लाख रुपयांचे बिल मंजूर न केल्यामुळे एका कंत्राटदाराने विष प्राशन करून बीएसएनएलच्या विभागीय कार्यालयासमोर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. उघडकीस आली.आनंद दिनेश बाबरिया (३०) रा. सी. ए. रोड, तेलीपुरा, बजेरिया असे मृत कंत्राटदाराचे नाव आहे.

आनंद हा मूळचा दिल्ली येथील रहिवासी आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब ऑप्टिकल फायबर व्यवसायात आहे.  त्यांचे आजवरचे काम दिल्ली आणि उत्तर भारत परिसरात आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेत आनंदच्या कंपनीला मिळाले होते.   गेल्यावर्षी बहुतांश काम पूर्ण केल्यानंतर त्यांनी जवळपास ९० लाखांचे बिल सादर केले. मात्र, मे २०१७ पासून त्यांचे बिल बीएसएनएलच्या झिरो माईल येथील महाव्यवस्थापक कार्यालयातून मंजूरच करण्यात आले नाही. हातामध्ये पैसे नसल्याने त्यांनी काम थांबवले. कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने आनंद हा तणावात होता. दररोज तो बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना भेटून कामाचे बिल मंजूर करण्याची विनंती करीत होता. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. काल, गुरुवारी तो पुन्हा  कार्यालयात गेला असता त्याला नकारच मिळाला, त्याऊलट त्याच्या कंपनीचा कंत्राटही रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली. या तणावात तो कार्यालयाच्या समोच आपली एमएच-३१, ईए-३५२३ क्रमांकाच्या कारमध्ये बसून होता. त्यानंतर पहाटेच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली. सकाळी ८.३० च्या सुमारास परिसरातील नागरिकांना गाडीमध्ये एक करूण बेशुद्धावस्थेत दिसला. त्यांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.  प्रथम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्याच्या दिल्लीतील कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. ते संध्याकाळपर्यंत नागपुरात पोहोचायचे होते.

मृत्यूपूर्वी व्हिडिओही तयार केला

विष प्राशन करण्यापूर्वी आपल्या मृत्यूचे कारण व बीएसएनएलच्या चार अधिकाऱ्यांची नावे एका कागदावर लिहले. त्यानंतर पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्याने आपल्या मोठा भावाच्या व्हॉट्स अ‍ॅपवर एका व्हिडिओ पाठवला. त्यातही त्याने मृत्यूचे कारण व संबंधित अधिकाऱ्यांची नावे सांगितली. त्यांच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सर्व व्हॉटस अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडून विष प्राशन करून आत्महत्या केली. यासंदर्भात बीएसएनएलच्या महाव्यवस्थापक नम्रता तिवारी यांना पत्रकार परिषदेत माहिती विचारली असता त्यांनी आपल्याला कार्यालयाबाहेर काय घडले, हे माहित नसल्याचे सांगितले.