करोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत काम करताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांना विमा कवच लागू करण्यात आले असून त्याबाबतची माहिती शिक्षण संचालनालयाकडून मागवण्यात आली आहे.

करोना साथरोग नियंत्रण मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखांचा विमा लागू करण्यात आला होता. मात्र, या मोहिमेत काम करत असताना दुर्दैवाने काही शिक्षकांचा मृत्यू झाला. परंतु त्यांना या विमा कवचाचा लाभ देण्यात आला नाही. अलीकडेच शासनाने एक पत्र काढून राज्य सरकारी कर्मचारी व जि.प. गट क व ड कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मागवून ते मंजूर करून त्यांना याबाबतचा लाभही देण्यात आला. परंतु, शिक्षकांना मात्र लाभ देण्यात आला नव्हता. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत अनेक शिक्षकांच्या सेवा संलग्न करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मोहिमेत काम करणाऱ्या शिक्षकांनासुद्धा विमा कवच लागू करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शासनाकडे लावून धरण्यात आली होती. अलीकडेच प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून याबाबत एक पत्र निर्गमित केले असून करोना साथरोग नियंत्रण मोहिमेत मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विमा कवचाचा लाभ देण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.