२४ तासांत १३ मृत्यू; ३२४ नवीन बाधितांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत १३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर ३२४ नवीन बाधितांची भर पडली. काही दिवसांपासून जिल्ह्य़ात सातत्याने नवीन बाधितांहून करोनामुक्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे  आजपर्यंत आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत केवळ ४.७७ टक्केच सक्रिय रुग्ण शिल्लक आहेत.

दिवसभरात आढळलेल्या नवीन बाधितांमध्ये शहरातील २४७ रुग्ण, ग्रामीणचे ७३, जिल्ह्य़ाबाहेरील ४ अशा एकूण ३२४ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ७३ हजार ७३८, ग्रामीण २० हजार ५७१, जिल्ह्य़ाहेरील ५९० अशी एकूण ९४ हजार ८९९ वर पोहचली आहे.  दिवसभरात शहरात ६, ग्रामीणचे ३, जिल्ह्य़ाबाहेरील ४ असे एकूण १३ रुग्ण दगावले. त्यामुळे आजपर्यंत शहरातील मृत्यूंची संख्या २ हजार १३७, ग्रामीण ५६५, जिल्ह्य़ाबाहेरील ४०८ अशी एकूण ३ हजार ११० वर पोहचली आहे.

दिवसभरात शहरातील ३१२, ग्रामीणचे १९८ असे एकूण ५०८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोनामुक्तांची संख्या ६८ हजार ३३९, ग्रामीण १८ हजार ९२० अशी एकूण ८७ हजार २५९ वर पोहचली आहे. आजपर्यंत आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण ९१.९५ टक्के आहे. सध्या शहरात केवळ ४.७७ टक्के (४ हजार ५३०) सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ३ हजार ९३ रुग्ण गृह विलगीकरणात, १ हजार ११३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

विदर्भातील मृत्यू

(२९ ऑक्टोबर)

जिल्हा                      मृत्यू

नागपूर                        १३

वर्धा                            ०२

चंद्रपूर                          ००

गडचिरोली                    ०२

यवतमाळ                    ०२

अमरावती                    ०२

अकोला                      ०२

बुलढाणा                     ०३

वाशीम                       ०२

गोंदिया                      ०२

भंडारा                       ०४

एकूण                       ३४

दैनिक चाचणीतील ५.४४ टक्के अहवाल सकारात्मक

शहरात दिवसभरात ४ हजार ७५९, ग्रामीणला १ हजार १८६ असे एकूण ५ हजार ९४५ चाचण्या झाल्या. त्यातील केवळ ५.४४ टक्के अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले.  एकूण चाचणीतील २ हजार ३६८ नमुने खासगी प्रयोगशाळेतील आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडून रक्तद्रव्य दान

डॉक्टरांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी करोनामुक्त झालेल्यांना रक्तद्रव्य (प्लाझ्मा) दान देण्याचे अनेकदा आवाहन केले आहे. परंतु त्यानंतरही प्रत्यक्षात रक्तद्रव्य दान देणाऱ्यांची संख्या कमी आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मात्र आज गुरुवारी स्वत रक्तद्रव्य दान देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. करोनामुक्त झाल्यावर त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन काम सुरू केले. आज गुरुवारी त्यांनी मेडिकलला जाऊन रक्तद्रव्य दान दिले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, प्लाझ्मा प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मोहम्मद फैजल, प्लाझ्मा पेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते उपस्थित होते.