संतोष फरारच; नव्याने भरला जाईल खटला उपराजधानीत खळबळ उडविणाऱ्या बाल्या गावंडे हत्याकांडातील आठ आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. परंतु या प्रकरणातील अन्य आरोपी आणि शहरातील कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर अद्याप फरार असल्याने त्यांच्या विरुद्ध खटला चालविण्यातच आला नाही. त्यामुळे त्याला अटक झाल्यानंतर पोलीस त्याच्याविरुद्ध परत एकदा आरोपपत्र दाखल करतील आणि त्यानंतर त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात येईल. त्यामुळे संतोष आंबेकरची अद्याप या प्रकरणातून सुटका झालेली नाही. हा खटला न्यायालयात सुरू असतानाही या हत्याकांडातील आरोपी गँगस्टर संतोष आंबेकर हा बेपत्ता होता. तो अद्यापही बेपत्ता आहे. ही घटना २२ जानेवारी २०१७ रोजी घडली होती. मृत बाल्या गावंडे हा आपला काटा काढेल, अशी भीती गँगस्टर संतोष आंबेकर याला होती. यातूनच त्याने बाल्याच्या हत्येची सुपारी योगेश कुंभारे याला दिली. योगेश याने शुभम व अन्य साथीदारांच्या मदतीने बाल्या गावंडे याच्या हत्येचा कट आखला. बाल्या ओळखीचा असल्याने त्याला सहजासहजी संशय येणार नव्हता. योगेश याने बाल्या याला २२ जानेवारीला कार्यक्रमासाठी कळमन्यातील तुकारामनगर येथील घरी बोलावले. दोघांनी दारू प्यायली. यादरम्यान वाद उकरून काढून योगेश व त्याच्या साथीदाराने बाल्याची निर्घृण हत्या केली, असा आरोप पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर लावला होता. याप्रकरणी कळमना पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली होती. १० मे रोजी कळमना पोलिसांनी या हत्याकांडाचे न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. यात संतोष आंबेकर याचेही नाव होते. हत्याकांडानंतर मात्र संतोष पसार झाला तो अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. न्यायालयानेही फरार घोषित करून संतोष आंबेकरविरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे त्याला अटक केल्यानंतर त्याच्या विरुद्ध परत एकदा दोषारोपपत्र दाखल करून खटला चालविण्यात येईल. परंतु या खटल्यातील इतर सर्व आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे, हे विशेष.