डॉ. आशिष देशमुख यांचा सवाल नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात करोना रुग्णांसाठी जम्बो रुग्णालय उभारले, पण करोना साथीला १४ महिने होऊन देखील नागपुरात जम्बो तर सोडा साधे कोव्हिड रुग्णालय उभारण्यात आले नाही. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रतत्न कमी पडत असल्याचे हे घोतक आहे, अशी टीका माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केली. ते म्हणाले, प्रशासन हतबल दिसत आहे. मुंबई, पुण्यात जम्बो रुग्णालय उभारण्यात आले. नागपुरात क्रीडा संकुलात पाच हजार खाटांचे जम्बो रुग्णालय होणार होते. त्याची घोषणा झाली होती. पण, अजूनही उभारण्यात आले नाही. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत त्यासाठी प्रयत्न करत असले तरी त्यांना तेवढा निधी आणि मदत मिळत नसेल तर त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. त्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यत्री नागपूर आणि विदर्भावर लक्ष देणार नाही तोपर्यंत येथील परिस्थिती सुधारणे कठीण आहे. विदर्भात करोनाची दुसरी लाट सुरू होऊन दोन महिने झाले. लोक रस्त्यावर मरत असताना जम्बो रुग्णालय उघडत नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातील आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यावर दबाव निर्माण करून नागपूर आणि विदर्भातील रुग्णांना खाटा, प्राणवायू, व्हेंटीलेटर, रेमडीसवीर पुरवण्याचे प्रयत्न करावे, असेही डॉ. देशमुख म्हणाले. परराज्यातील रुग्णांना थांबवा नागपुरात मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील रुग्ण येत आहेत. परिस्थिती गंभीर आहे. जिल्ह्यातील रुग्णांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत. लोकांना घरी राहून उपचार करण्याची वेळ येत आहे. लोक मरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये परराज्यातील रुग्णांना नागपुरातील खाटा वापरण्यास मनाई करावी, अशी मागणी डॉ. देशमुख यांनी केली.