कन्या वन समृद्धी योजनेत बावीस हजार झाडांची लागवड

शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड  करायची, असा संस्कार वन विभागाने  कन्या वन समृद्धी योजनेतून घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या योजनेमुळे  शेतकऱ्यांच्या लेकीचं तिच्या नावाने लावलेल्या झाडाशी नातं अधिक दृढ केलं. योजनेत राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात २१७७ मुलींच्या जन्मानंतर  २१७७० रोपांची लागवड  झाली.

पुणे विभागाने या योजनेत आघाडी घेतली आहे.  ९७१ मुलींच्या जन्मानंतर तिथे सर्वाधिक ९,७१० रोपांचे वाटप करण्यात आले. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये ६७४ मुलींच्या जन्मानंतर ६७४० रोपांचे वितरण योजनेअंतर्गत करण्यात आले. अमरावतीमध्ये ४३८ मुलींच्या जन्मानंतर योजनेतून ४३८० झाडं लागली. औरंगाबाद, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यंत या योजनेत शेतकऱ्यांच्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे झाडांचे वितरण केले आहे. ज्या   शेतकऱ्यांच्या घरी मुलगी जन्माला येते त्या शेतकरी कुटुंबाने पुढे येत या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याची आवश्यकता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

उत्पन्नाचा स्रोत वाढेल

मुलीच्या जन्माबरोबर वृक्ष लावल्यास तिच्या लग्नापर्यंत हे वृक्ष मोठे झालेले असतील.  त्यातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत देखील विकसित होऊ  शकेल. सागाच्या वृक्षांपासून उत्पन्न मिळेल, अशी प्रतिRि या  मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

सुरक्षित पर्यावरणासाठीही

नव्याने उमलणाऱ्या पिढीत आपल्या नावे लागलेल्या वृक्षांप्रति आवड निर्माण झाल्याने वृक्ष जगण्याचे प्रमाण वाढेल. पर्यावरण रक्षण, वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपनाची भावना त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होईल, असा विश्वास यातून व्यक्त  होत आहे.

योजनेतून ही १० झाडे मिळतात

ज्या शेतकरी दाम्पत्याच्या घरी मुलगी जन्माला येईल, त्यांना वनविभागाकडून पाच सागाची तर पाच फळझाडांची रोपे प्रोत्साहन म्हणून दिली जातात.  फळझाडांच्या रोपांमध्ये २ आंब्याची, १ फणसाचं, १  जांभळाचं तर एक  चिंचेचं रोप देण्यात येते.  भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन वृक्षांची निवड करण्यात आली आहे.

असा घ्यायचा योजनेचा लाभ

शेतकऱ्यांनी  घरी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीत तिच्या नावाची नोंद करावयाची आहे व योजनेसाठी अर्ज करायचा आहे.