गरिबांची सेवा करताना मदर तेरेसा यांना ईश्वराची अनुभूती झाली. त्यांचे कार्य जगातील ५२ देशात सुरू आहे. समाजातील शेवटच्या घटकांची सेवा हाच संत मदर तेरेसा यांचा संदेश आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आल्याबद्दल येथील कामठी मार्गावरील सेंट फ्रान्सिस डिसेल्ट कॅथेड्रालच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आर्य बिशप अब्राहमविरुया कुलंगरा, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिस अहमद, विविध धर्माचे धर्मगुरू यावेळी उपस्थित होते. व्यक्तींचे संस्कार व धर्माचे अनुष्ठान सेवेसाठी आवश्यक आहे. आज जगातील सर्व जण मदर तेरेसा यांना नमन करतात. त्यांच्या सेवेचा वारसा आपण पुढे चालवावा, गरीब, अनाथांची सेवा करावी व त्यांचे कार्य समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. मदत तेरेसा यांनी त्यांचे संपूर्ण जीवन सेवा कार्यासाठी दिले, असे नितीन गडकरी म्हणाले. प्रास्ताविक आर्य बिशप अब्राहमविरुया कुलंगरा यांनी केले. यावेळी गडकरी-फडणवीस यांच्या हस्ते मदर तेरेसा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संचालन फादर प्रशांत यांनी केले, आभार सिस्टर कुरिया कोसा यांनी मानले.