तक्रारच मागे घेतल्याने आता चौकशीवर प्रश्नचिन्ह

हिंगोली : वसमत तालुक्यातील चिखली येथील प्रकरणात बनावट सातबारा होल्डिंग तयार करून पोखरा अनुदानासाठी परस्पर प्रस्ताव दाखल करून शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून दोषी विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार चिखली येथील शेतकरी चांदूजी कदम यांनी हट्टा पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस तपासाच्या कामाला वेग येताच तक्रारदाराने घूमजाव करत आपली तक्रारच मागे घेतल्याने आता या प्रकरणाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे याप्रकरणात पोलिसांनी तपास करावा, तक्रारदाराने प्रथम तक्रार का दिली आणि नंतर ती मागे का घेतली?, याचा तपास करण्यासह ‘पोखरा’ योजनेला पोखरणाऱ्यांना अभय दिले जाता कामा नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गोरख पाटील यांनी केली आहे. याप्रकरणात हट्टा पोलीस ठाण्याच्या वतीने कृषी विभागाला पत्र देऊन कागदपत्रे सादर करण्याचे सूचित केले होते. मात्र, कृषी विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत, असा आरोप केला जात आहे.

पोलिसांनीच सत्यता उजेडात आणावी

वसमत तालुक्यात बनावट सातबारा होल्डिंग आणि इतर कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्यांची टोळी असल्याची चर्चा कायमच होत आहे. फळबाग अनुदान योजनेसाठी बनावट फळबागा दाखवून किंवा जिल्ह्याबाहेरील फळबागा दाखवून अनुदान लाटण्याचे प्रकार झाल्याचे अनेक प्रकार गाजले. परंतु कोणाची तक्रार नसल्याने याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. याप्रकरणाची सत्यता पोलीस यंत्रणा व कृषी विभागाच्या वरिष्ठांनी उजेडात आणावी व दोषी विरुद्ध कारवाई करावी. – गोरखपाटील, पदाधिकारी, शेतकरी संघटना.