बहादुरा परिसरात मध्यरात्री थरार

घराच्या छतावर फिरत असलेल्या तरुणीला ओलीस ठेवून तिच्या घरात शिरून कुटुंबातील इतर सदस्यांवर गोळीबार करण्याची तसेच याला अटकाव करणाऱ्यांवर चाकू हल्ला करण्याची घटना सोमवारी मध्यरात्री बहादुरा परिसरात घडली. कुटुंबातील एका तरुणाने हल्लेखोरांचा धर्याने सामना केल्याने सर्वजण पळून गेले.

तीन दिवसातील गोळीबाराच्या दुसऱ्या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या घटनेत भावेश संजय नगरधने (२२) आणि कुंदा संजय नगरधने (४४) जखमी झाले. भावेश हा आईवडील, भाऊ व बहिणीसह बहादुरा परिसरात राहतो. त्यांचे शेतातील मंदिराच्या वरच्या मजल्यावर घर आहे. काही महिन्यांपूर्वी भावेशच्या वडिलांनी दीड कोटीला शेतजमीन विकल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री ९ वाजता एक तवेरा कार त्यांच्या घराच्या परिसरात फिरत होती. नागरिकांनी हटकल्याने चालक कार घेऊन निघून गेला होता. रात्री भावेश आईवडील व गुणवंत यांच्यासह टीव्ही बघत होता. त्याची बहीण वैष्णवी ही छतावर फिरत होती. त्यावेळी तिला मंदिराच्या घुमटामागे काही तरुण तोंड बांधून लपलेले दिसले. काही हालचाल करण्यापूर्वी ते छतावर पोहोचले व त्यांनी तिच्या कानशीलावर बंदूक रोखली. तिला घेऊन घरात प्रवेश केला. तेथे हवेत गोळीबार केला. दरम्यान, भावेश हा बहिणीला वाचवण्यासाठी सरसावला असता एकाने त्याच्या पोटात चाकू भोसकला. इतक्यात गुणवंतही त्याच्या मदतीसाठी धावला असता हल्लेखोरांनी दोन गोळ्या हवेत झाडल्या. मात्र, गुणवंत न घाबरता एका काठीने हल्लेखोरांवर तुटून पडला. हल्लेखोरांच्या हातातील चाकू खाली पडला व ते घाबरले व प्रतिहल्ल्याच्या भीतीने हल्लेखोर गोळ्या झाडून तवेराने पळून गेले.

या झटापटीत भावेशची आई कुंदा यांच्या पायालाही दुखापत झाली. त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला. तो ऐकून शेजारी राहणाऱ्या बंटीने भ्रमणध्वनी करून विचारणा केली. त्यावेळी सर्व प्रकार समजला.

बंटीने ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सक्करदरा पोलीस निरीक्षक सांदीपन पवार हे इतर कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याशिवाय पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर आणि उपायुक्त एस. चैतन्य यांनीही रात्री घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

प्रेमाच्या त्रिकोणातून हल्ल्याची शक्यता

भावेशचे एका तरुणीवर प्रेम आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून हा हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता आहे. त्याशिवाय नगरधने कुटुंबीयांनी शेत विकल्याने त्यांच्याकडे कोटय़वधी रुपये आहेत. ते लुटण्याचा उद्देशही या हल्ल्यामागे आहे का, या अंगानेही पोलीस तपास करीत आहेत. तपासाकरिता अनेक पथक तयार करण्यात आले असून सहपोलीस आयुक्त हे आज दुपारी ३ वाजेपर्यंत सक्करदरा ठाण्यात तळ ठोकून होते. त्यामुळे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे दिसून येते.

तीन दिवसांत दुसऱ्यांदा गोळीबार

शुक्रवारच्या रात्री जरीपटका पोलीस ठाण्यात एका बारसमोर कुख्यात गुंडांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात अवैध शस्त्र असल्याचे समोर येत आहे.