बांबूपासून कापडापर्यंत चढय़ा दराने विक्री मृत्यूनंतरच्या विधीलाही आता व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. रुग्णवाहिका, शववाहिनी, घाटावर लागणारे सामान एवढेच नव्हे तर अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या साहित्याची चढय़ादराने विक्री करून अक्षरश: लूट केली जात आहे. विविध धर्मानुसार अंत्यसंस्काराच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. हिंदू धर्मातील पद्धतीनुसार अंत्यसंस्कारासाठी तिरडीकरिता बांबू, त्यावर अंथरण्यासाठी कापड, फुले, राळ, नवीन कापड आदी साहित्याची आवश्यकता असते. घरात निधनाची घटना घडल्यावर कुटुंबीय अंत्यसंस्काराच्या तयारीला लागल्यावर सर्वप्रथम या साहित्याची जुळवाजुळव करतात. शहरातील विविध भागात साहित्य विक्रीची मोजकीच दुकाने आहेत. महालमध्ये केळीबाग रोड, दक्षिण नागपुरात बुधवारी बाजार, हनुमानगर, मेडिकल चौक, पश्चिम नागपुरात गोकुळपेठ यासह त्या-त्या भागातील प्रमुख चौकात साहित्य विक्रीची दुकाने आहेत. प्रत्येक भागात साहित्याचे दर वेगवेगळे आहेत. केळीबाग मार्गावरील दुकानात १७०० रुपयांत सर्व साहित्य मिळते, तर बुधवारी बाजारात त्याची किंमत १३०० रुपये आहे. गोकुळपेठ परिसरातील दुकानात ही किंमत १८०० रुपये असते तर मडिकल चौकात १५०० रुपयात साहित्य मिळते. गरज आणि निकड लक्षात घेऊन किंमती ठरतात. अनेक वेळा दुकानात बाबू उपलब्ध नसतात. तुटलेले, तडा गेलेले बांबू देऊन बोळवण केली जाते. अंत्यसंस्कारासाठी लागणारे छोटे मडके बाजारात ३० रुपयात मिळते, दुकानदार ते ५० रुपयाला विकतात. चितेवर टाकण्यासाठी राळ वापरली जाते. या दुकानातून मिळणारी राळ ही माती व रेती मिश्रित असते. कापड खरेदीचा आग्रह विक्रेते करतात. बाजारात १०० ते २०० रुपयात मिळणारे कापड विक्रेते ५०० रुपयाला विकतात. त्याचा दर्जा निकृष्ट असतो, अनेकदा ते फाटलेले असतात. कापड घेतले नाही, तर इतर साहित्य देत नाही, त्यामुळे विक्रेता म्हणेल त्या किंमतीला ते खरेदी करावे लागते. हार आणि फुलांच्या बाबतीतही अशीच लूट केली जाते. बाजारभावाच्या दुप्पटीने ती विकली जाते.