विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्य हे सरकारने शिफारस केलेले असतात. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची नियुक्ती अडवून ठेवली आहे. हा लोकशाहीचा खून आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शहरात आल्यावर ‘मिट द प्रेस’मध्ये ते बोलत होते.

पटाले म्हणाले, सरकारने सूचित केलेल्या सदस्यांची नियुक्ती अडवून ठेवणे योग्य नाही. राज्यपाल तसे गरीब आहेत. त्यांच्याकडे बघितल्यावर तसे वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा त्यांच्यावर दबाब असावा. हे प्रकरण असेच प्रलंबित ठेवल्यास न्यायालयात जाऊ.  सेलिब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीबाबत ते म्हणाले, त्यांचे ट्विट सारखे आहेत. मोदी सरकार आणि भाजपची प्रतिमा मलीन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर ट्विट करण्यासाठी दबाब होता काय, हे तपासण्याची काँग्रेसची मागणी आहे. कोणत्याही  सेलिब्रिटींना त्रास देण्याचा उद्देश नाही, असा दावाही त्यांनी केला.

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळणार, अशी चर्चा असल्याचे विचारले असता पटोले म्हणाले, काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आहे. उपमुख्यमंत्री पदाची चर्चा केवळ माध्यमात आहे.