मुख्यमंत्र्यांच्या समक्ष शंकराचार्याचा हिंदूंना सल्ला ‘हिंदूंनी फक्त माळा जपून चालणार नाही तर प्रसंगी त्यांना हातात भालाही घ्यावा लागेल. त्यामुळे हिंदूंनी एका हातात भाला तर दुसऱ्या हातात जपमाळा, असे आचरण ठेवावे.’, असा सल्ला दिला आहे काशी विश्वेश्वर पीठाचे स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी. येथे सुरू असलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभात शंकराचार्यानी हा सल्ला दिला. तर बद्रीनाथ ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येच्या पाश्र्वभूमीवर हिंदू दाम्पत्यांनी किमान दहा मुले जन्माला घालावीत, असा सल्ला दिला! येथील रेशीमबाग मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून धर्मसंस्कृती महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. रविवारी या महाकुंभाचा समारोप झाला. त्यावेळी दोन्ही शंकराचार्यानी वरीलप्रमाणे सल्ले दिले. स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी देशाच्या पूवरेत्तर भागातील धर्मातराचा मुद्दा उपस्थित केला. हिंदूंनी त्यांची शक्ती ओळखावी आणि परिस्थितीनुरूप वागावे. फक्त माळा जपून चालणार नाही, तर प्रसंगी हाती भालाही घ्यावा लागेल. यासाठी ‘एक हातमे भाला, दुसरे हात मे माला’ असे आचरण ठेवावे, असे आवाहनही केले. देशात समान अधिकार कायदा असावा, हज यात्रेप्रमाणेच हिंदूंच्या यात्रेलाही सवलती द्याव्या, ज्याप्रमाणे एकाही मशिदीवर सरकारी ताबा नाही त्याच धर्तीवर हिंदूंच्या काही मंदिरावरील सरकारी ताबा मागे घ्यावा. हिंदूजीवन पद्धतीनुसार जगण्याची आचारसंहिता असावी, असे नरेंद्रानंद म्हणाले. तर वासुदेवानंद सरस्वती यांनी हिंदू लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला. ‘इस्लाम खतरे मे है’ असे सांगत एकीकडे भारतात मुस्लिमांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे ‘हम दो हमारे दो’ यामुळे हिंदूंची संख्या कमी होत आहे. त्यामुळे हिंदू दाम्पत्यांनी किमान १० मुलांना जन्म द्यावा आणि त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी परमेश्वरावर सोडावी, असा सल्ला त्यांनी दिला. भारत जगाचा मार्गदर्शक ठरेल -फडणवीस * या महाकुंभाचे निमंत्रक आणि देवनाथपीठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. भारताची ओळख विश्वगुरू म्हणून जगाला होती, परंतु कधीही भारताने कोणावरही आक्रमण केले नाही. * आमच्या संस्कृतीने आणि विचाराने खूप काही दिले असून याच्याच आधारावर भारत देशाला मार्गदर्शक करणारा देश म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. * यावेळी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.