प्रकल्पात पंतप्रधानांचे योगदान – भाजप; आमच्या काळातच मंजुरी – आघाडी

नागपूर : महामेट्रोच्या ‘अ‍ॅक्वालाईन’ मार्गाचा उद्घाटन समारंभ या प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून चांगलाच रंगला. व्यासपीठावर उपस्थित भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये यासाठी जणू चढाओढच लागली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र या प्रकल्पाचे श्रेय जनतेला आहे, असे सांगून तीनही पक्षाच्या नेत्यांपासून स्वत:ला वेगळे ठेवले.

मेट्रोच्या सुभाषनगर स्थानक परिसरात मंगळवारी आयोजित कार्यक्रमात अ‍ॅक्वालाईनचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे शहराच्या दोन तृतीयांश भागात मेट्रोचे जाळे विणले गेले आहे. केंद्र, राज्य आणि महापालिका यांची संयुक्त कंपनी असलेली महामेट्रो या प्रकल्पाची उभारणी करीत आहे. अ‍ॅक्वालाईनचे ९० टक्के काम मागच्या राज्य सरकारच्या काळात  पूर्ण झाले होते. त्याचे मात्र लोकार्पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात होत असल्याने त्यात राजकीय टोलेबाजी होणार हे अपेक्षित होते. त्यानुसार ती झालीही. व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सचिव व्ही.जी. मिश्रा यांनी मोदींमुळेच नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्प झाल्याचे ठासून सांगितले. व्हीडीओ लिंकद्वारे या कार्यक्रमाशी जुळलेले केंद्रीय राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनीही हाच मुद्दा मांडला. ३१ ऑगस्ट २०१४ ला या प्रकल्पाचे भूमिपूजन मोदी यांनी केले होते. खापरी ते बर्डी या मार्गाचे उद्घाटनही त्यांनी व्हीडीओ लिंकद्वारे केले होते, असे यावेळी सांगण्यात आले. केंद्र सरकार व मागील सरकारने वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच  प्रकल्पाच्या कामाची गती सांभाळणे शक्य झाल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले.

व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीचे मंत्री व काँग्रेस नेते नितीन राऊत, अनिल देशमुख आणि सुनील केदार यांनी ही बाब त्यांच्या भाषणात खोडून काढली. मेट्रोची संकल्पना ही तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची होती. २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती, मंत्री म्हणून आम्ही हा प्रकल्प नागपूरमध्येच व्हावा म्हणून आग्रही भूमिका घेतली होती, असे नितीन राऊत आणि अनिल देशमुख यांनी सांगितले. तेव्हा पुण्यासाठी नागपूर मेट्रोच्या प्रस्तावाला विलंब झाल्याचा आरोप यावेळी नितीन राऊत यांनी राष्टवादीच्या नेत्यांची नावे न घेता केला.

विलासराव देशमुख यांच्या काळात एकात्मिक रस्ते विकास योजनेतून प्रथम नागपुरातील रस्ते रुंद करण्यात आले. पहिल्या दहा उत्कृष्ट शहरामध्ये तेव्हा नागपूरचा समावेश होता. तेव्हापासूनच नागपूर बदलायला लागले, असे अनिल देशमुख म्हणाले. सुनील केदार यांनीही मेट्रोची मूळ कल्पना विलासराव देशमुख यांची असल्याचे सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मेट्रोचे श्रेय केंद्र सरकारला देऊ इच्छित नव्हते तर दुसरीकडे आमच्यामुळेच हा प्रकल्प शक्य झाला असा दावा भाजप नेते करीत होते. मात्र यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे</p>

यांनी मात्र मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचे श्रेय गडकरी, फडणवीस यांना देऊन विकासाच्या कामात राजकारण नको, असा अप्रत्यक्ष सल्ला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.

क्षणचित्रे

* महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारून कार्यक्रमाला आलेले तुकाराम मुंढे  यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. राज्यशिष्टाचार बाजूला ठेवून उपस्थित मंत्र्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखवण्यात आला. देशात २७ शहरात मेट्रोचे ९२२ किमीचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर देशात १६०० किमी.वर मेट्रो धावायला लागेल, असे केंद्रीय नगरविकास सचिव व्ही.जी. मिश्रा यांनी सांगितले.

* या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, विकास महात्मे, आमदार विकास ठाकरे, मोहन मते, समीर मेघे, प्रकाश गजभिये, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.

* जयजवान जय किसान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाबाहेर निदर्शने केली.

श्रेय जनतेचे – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मेट्रोच्या कामाचे, त्यासाठी पाठपुरावा करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. कोणत्याही राजकीय नेत्याला श्रेय घेणे आवडते. राजकारणी म्हटल्यावर श्रेयवाद येतोच. पण, आम्हाला श्रेय नकोय, आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवे आहेत. नागपूरकरांच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्र्यांकडून महामेट्रोला समज

जाहिरातीत पालकमंत्र्यांसह राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्र्याची नावे नसल्याने पालकमंत्री नितीन राऊत संतापले. पुन्हा अशी चूक होऊ नये याची काळजी महामेट्रोने घ्यावी, अशी समज दिली.