अॅनिमेशनचे योग्य शिक्षण भारतात कुठेही मिळत नसून लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे अतिशय निकृष्ट दर्जाच्या अॅनिमेशनची निर्मिती होत असल्याची टीका कला आणि अॅनिमेशनमधील तज्ज्ञ विजय राऊत यांनी येथे केले. ‘कार्टुनिस्ट कंबाईन’ आणि ‘कार्टून झोन’ या व्यंगचित्रकारांच्या संघटनांनी आयोजित दोन दिवसीय संमेलन आणि व्यंगचित्रांचे प्रदर्शन चिटणवीस सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले. त्यात ‘कला आणि अॅनिमेशन’ विषयावर बोलताना राऊत यांनी भारतीयांची मानसिकता, कलेबद्दलची अनास्था, अॅनिमेशन यावर थोडक्यात पण प्रभावी मते व्यक्त करून नवोदितांना मार्गदर्शन केले. मूळचे वैदर्भीय असले तरी त्यांच्या कर्मभूमीमुळे ते आता मुंबईकर झाले आहेत. त्यांच्या विद्यार्थी दशेत कुटुंबीयांकडून त्यांनी टेक्सटाईल क्षेत्रात जावे, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना कलेच्या क्षेत्राची भूरळ होती. शहरात लागणारी मोठमोठी होर्डिग्ज, बॅनर याची छाप त्यांच्यावर असायची. त्यामुळे याच क्षेत्रात पुढे जायचे त्यांनी ठरवले. सामान्य माणसांनाच काय पण अधिकारी, जिल्हाधिकारी, मंत्र्यांनाही कलेचे ज्ञान नसल्याची उदाहरणे देऊन त्यांनी उपस्थितांना हसवले. कार्टुनिस्ट कंबाईनचे वैजनाथ दुलंगे यांचे पोट्रेट, राजीव गायकवाड यांचे कॅरिकेचर हुबेहुब साकारून त्यांनी रसिकांची दाद मिळवली. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंशी कलेच्या माध्यमातून आलेला संबंध आणि ठाकरे कुटुंबाकडून ‘कॅरिकेचर’चे मिळालेले धडे याचाही उल्लेख त्यांनी त्यांच्या व्याख्यानात केला. त्यांची ओळख ‘चिंटू’कार चारुहास पंडित यांनी करून दिली. राजकीय मंडळींपैकी दत्ता मेघे यांच्या कोणत्याही वास्तू घ्या. त्यात कला डोकावत असल्याने महालासारख्या त्यांच्या वास्तू वाटतात. त्याचवेळी सांगली- साताऱ्याकडील मंत्र्यांच्या वास्तू पहा झोपडपट्टी बरी! रंग, रंगसंगतीचेही जुजबी ज्ञान लोकांना नसते. आमच्या कलेला सुरुवातीला लोक अॅनिमेशन नव्हे तर लॅमिनेशन म्हणायचे. खुद्द आमदार रवी राणा लॅमिनेशन म्हणायचे, असे काही किस्से त्यांनी सांगितले. भारतीय कलावंत कलेच्या क्षेत्रात सातत्य ठेवत नाही किंवा तो लगेच तडजोडीवर येतो. मी तयार केलेले पोट्रेट किंवा पेंटिंग लाखो रुपयांना विकल्या जातात. कारण मी तडजोड करत नाही. त्यामुळे किंमत मिळते. चांगला कलावंत असेल तर कलेची कदर नक्कीच होते. कला आपल्याकडे आताही आहे आणि पूर्वीही होती. खजुराहो वगैरेंसारखी लेणी त्याचे उत्तम उदाहरण आहे. केवळ १० ते ६ काम करण्याची कारकुनी वृत्ती कलावंतांनी सोडायला हवे तसेच मिळणारा पैसा कमी आहे म्हणून मर्यादित काम करण्याची वृत्ती भारतीय कलावंताने सोडायला हवी. - विजय राऊत, विश्व अॅनिमेशन