केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे प्रतिपादन नागपूर : काश्मीर प्रश्न आता प्रांतिक राहिलेला नाही, तो धार्मिक वळणावर गेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी येथे केले. रविवारी साई सभागृहात आयोजित डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अहिर पुढे म्हणाले, काश्मीरचा आजार आजचा नाही. चुका करणारे चुका करून गेले पण, आता ही परिस्थिती चिघळत आहे. काश्मीर प्रश्न धार्मिक वळणावर गेला आहे. या राज्याला विदेशातून, खास करून कॅनडा, आखाती देशांमधून मोठय़ा प्रमाणात आर्थिक ओघ सुरू आहे. पाकिस्तानच्या रोजच्या कुरापती सुरू आहेत, परंतु अजूनही सीमेवर पूर्णपणे तारेचे कुंपण झालेले नाही. तरीही आमचे सैनिक दहशतवाद्यांना भारतात शिरण्यापासून परावृत्त करीत आहेत. त्यात यशही येत आहे. तरीही अलीकडच्या काळात सर्वाधिक त्रास व्हॉटस् अॅप मुळे वाढला आहे. शुक्रवार आला की त्रास वाढतो, याकडेही अहिर यांनी लक्ष वेधले. पठाणकोटचा हल्ला सोडला तर आता दहशतवादी हल्ले कमी झाले आहेत. पाकिस्तानकडे होणारी दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.