सहा जणांची निर्दोष मुक्तता; १४ हजार चौरस फुटाच्या भूखंडातून तीन वर्षांपूर्वीचा थरार झिंगाबाई टाकळी परिसरातील १४ हजार चौरस फुटाच्या भूखंडावर डोळा ठेवून घडलेल्या सूरज अशोक यादव (२८) या बहुचर्चित हत्याकांडात विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी कुख्यात नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून सहा जणांची निर्दोष सुटका केली आहे. आरोपींनी २०१२ मध्ये सूरज यादव याच्या घरावर हल्ला केला आणि रस्त्यावर खेचून तलवारीने वार करून ठार मारले होते. डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्र सिंग नानकसिंग दिगवा (३६) रा. वैशालीनगर, गोल्डी सरदार ऊर्फ कुलजितसिंग गोपालसिंग मुलतानी (३१) रा. बाबा बुद्धाजीनगर, मनजितसिंग ऊर्फ सन्नी ऊर्फ गुटई दिगवा (२८) रा. वैशालीनगर, छोटू ऊर्फ संदीपसिंग जोहर (३८) रा. वैशालीनगर, बबलू ऊर्फ मेहरोज हुसेन (३९) रा. ताजनगर, टेका, रवींद्रसिंग ऊर्फ बंटी ऊर्फ लंगडा आनंद (४१) रा. सुंदरभवन, बुद्धनगर, पप्पू गजानन झाडे (३१) रा. सोनारटोली यशोधरानगर, विनोद रामराव पंचाग (३४) रा. यशोधरानगर आणि आकाश पुरुषोत्तम माहुरकर (३१) रा. सुजातानगर अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मनिंदरजितसिंग जे.पी. सरदार सोढी (२८) रा. अशोकनगर, अनुप ऊर्फ पिंटू फुलचंद चौरे (३६) रा. रामनगर, गौतम विठ्ठल पिल्लेवान (४५) रा. महाकालीनगर, बंटी ऊर्फ आनंद रमेश नायर (३९) रा. ख्रिश्चन कॉलनी मेकोसाबाग, आकाश रवींद्र बोस (२७) रा. मानेवाडा रोड, तिरुपती बाबुराव भोगे (३४) रा. शांतीनगर आणि आशीष काल्या ऊर्फ महेंद्र अनिल रामटेके (३०) रा. जयभीमचौक इंदोरा अशी सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नगरसेवक मुन्ना यादव यांच्या संबंधातील संजय देशमुख यांनी २००४ मध्ये पांडुरंग डोये आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून २० लाखांमध्ये झिंगाबाई टाकळी येथे १४ हजार चौरस फूट जागा विकत घेतली होती. त्यानंतर त्या जागेवर सुरक्षा भिंत आणि सुरक्षा रक्षकासाठी एक खोली बांधण्यात आली. या जागेच्या सुरक्षेसाठी आणि अतिक्रमणापासून बचाव करण्यासाठी देशमुख यांनी मुन्ना यादव यांना सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मदत मागितली. त्यावेळी मुन्ना यादव यांनी आपला मेहुणा सूरज यादव रा. नवा नकाशा याला त्या जागेवर सुरक्षा रक्षक नेमण्याची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर सूरजने रवि तागडे आणि त्याची पत्नी सोनू तागडे यांना त्या ठिकाणी सुरक्षेकरिता नेमले. ते दाम्पत्य भूखंडावर तयार करण्यात आलेल्या खोलीतच राहत होते. या भूखंडावर कुख्यात डल्लूचा डोळा होता. १७ नोव्हेंबर २०१२ ला तो आपल्या २० ते २५ साथीदारांसह भूखंडाच्या ठिकाणी पोहोचला आणि हा भूखंड आपला असून तागडे दाम्पत्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनूने सूरज याला भ्रमणध्वनी केला असता तो यवतमाळात होता. त्यावेळी सूरज आणि डल्लू यांच्यात संभाषण झाले. त्याच रात्री सूरज हा यवतमाळहून नागपुरात परतला. दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ नोव्हेंबर २०१२ ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास डल्लू आणि त्याच्या साथीदारांनी पागलखाना चौकात सूरजला चर्चेकरिता बोलाविले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला, परंतु सूरज हा वाद टाळून घरी परतला. त्यावेळी डल्लू आणि त्याच्या साथीदारांनी सूरजचा पाठलाग केला आणि दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास त्याच्या घरावर तलवारीने हल्ला केला. सूरजला घरातून खेचले आणि त्याची पत्नी, भाऊ, बहिणीसमोर तलवारीने ३३ घाव मारून ठार केले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध मोक्का लावला. त्यानंतर प्रकरणाची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्यासमक्ष झाली. सरकारतर्फे एकूण ३८ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नऊ जणांना खुनाच्या कलमाखाली जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावला, तर उर्वरित सहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रशांत सत्यनाथन यांनी बाजू मांडली, तर फिर्यादी राजेश यादव याच्यावतीने अॅड. बी.एम. करडे आणि आरोपींतर्फे अॅड. सुरेंद्र सिंग, देवेंद्र चौहान, चंद्रशेखर जलतारे, आर.बी. गायकवाड, राजेश तिवारी, अशोक भांगडे यांनी बाजू मांडली. सूरजची बायको फितूर आरोपींनी सूरजला घरातून खेचताना त्याची पत्नी मनदीप कौर यादव ही घरात उपस्थित होती. ती त्यावेळी गर्भवती होती. आरोपींनी मनदीप हिच्या पोटावर लाथ मारून सूरजला खेचले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनदीपला एक मुलगी झाली. बाळंतपणाच्या दुसऱ्या दिवशीच मनदीप मुलीला सोडून माहेरी निघून गेली. या प्रकरणात नवऱ्याचा खून डोळ्याने बघूनही मनदीपने पोलिसांना दिलेल्या बयाणाच्या उलट न्यायालयात साक्ष दिली आणि फितूर झाली. घटनेपूर्वी मुन्ना यादव यांची मध्यस्थी डल्लू आणि त्याच्या साथीदारांनी धमकी दिल्यानंतर सूरजने मुन्ना यादव यांना माहिती दिली होती. त्यानंतर घटनेच्या दिवशी सकाळी मुन्ना यादव यांनी डल्लू सरदार आणि सूरज यांना घेऊन एक बैठक घेतली आणि हे भूखंड देशमुख यांचे असून डल्लूने त्यापासून दूर राहावे असे सांगितले होते. त्यानंतर मुन्ना यादव तेथून निघून घरी परतले. त्यानंतर काही वेळातच डल्लू आणि त्याच्या साथीदारांनी सूरजच्या घरावर हल्ला करून रस्त्यावर हत्या केली. या घटनेनंतर परिसरात अनेक दिवस दहशतीचे वातावरण होते.