गोसीखुर्द प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करा, भूसंपादनाची कामे तात्काळ पूर्ण करून सिंचनातून कृषी व पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पवनी व ब्रम्हपुरी येथे गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव अजय मेहता यांच्यासहित अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी ब्रम्हपुरी येथे घोडाझरी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याजवळच बैठक घेवून प्रकल्पाविषयीची माहिती जाणून घेतली. तसंच गोसीखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेली कामं, या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचन क्षमता याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून गोसीखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेला सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. "प्रकल्प पूर्ण करताच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचं योग्य पूर्नवसन व्हावं तसंच पूर्नवसन झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे," असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. विकासाची कामे करतांना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी ताफा अडवला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ब्रम्हपुरी येथे घोडझरी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्री यांचे गाडीचा ताफा अडविला. यावेळी शेतकऱ्यांनी १५ वर्षांपासून आम्हाला एक थेंब पाणी मिळालं नाही, मोबदला मिळाला नाही अशी व्यथा मांडली. तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी गाडीच्या खाली उतरून शेतकऱ्यांशी चर्चा केली व याबाबत माहिती घेतो आणि सर्व कामे मार्गी लावतो असं आश्वासन दिलं.