|| मंगेश राऊत

विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालकांचे प्रतिपादन:- ‘मॉब लिचिंग’ हा भारतीय शब्द नाही. विदेशी धर्मग्रंथामध्ये लिचिंग शब्दाचा उल्लेख असून तो शब्द भारतात कसा रुढ झाला, हे शोधण्याची गरज आहे, असे  प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

विजयादशमीनिमित्त मंगळवारी येथील रेशीमबाग मैदानावर संघाच्या वियजादशमी उत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना मोहन भागवत बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एचसीएल समूहाचे अध्यक्ष शिव नाडर यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.  यावेळी सरसंघचालक म्हणाले, जमावाकडून कुणाची हत्या होण्यासाठी लिचिंग या शब्दाचा वापर करण्यामागे षडयंत्र आहे. काही लोक स्वत:ची राजकीय पोळी शेकण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हिंदू समाजाला बदनाम करून अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा घटनांचे समर्थन करीत नाही. यातील आरोपींवर कायद्यांतर्गत कठोर कारवाईची आवश्यकता आहे.

यावर्षी अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. २०१९ मध्ये केंद्र सरकारला जनतेने २०१४ पेक्षा अधिक जागांवर निवडून दिले. विद्यमान सरकार धाडसी असून अनेक वर्षांपासून प्रलंबित ३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला इतर पक्षांनीही संसदेच्या दोन्ही सभागृहात पाठिंबा दिला. हे सरकारचे मोठे यश असून पंतप्रधान, गृहमंत्री व विद्यमान सरकार त्यासाठी अभिनंदनास पात्र आहे.

भारतीय वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण धृवावर चांद्रयान पाठवण्याची मोहीम हाती घेतली. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसली, तरी चांद्रयानाने केलेला प्रवास कौतुकास्पद आहे. पण, केवळ यावर समाधान माणून चालणार नाही. विश्वगुरू बनण्याचे अंतिम लक्ष्य गाठण्याचा टप्पा अद्यापही दूर आहे. हा टप्पा गाठण्याच्या मार्गात दहशतवादी व फुटीरवाद्यांसारखे अनेक अडथळे येतील. या दिशेने सीमा सुरक्षेसंदर्भात सरकारने केलेले कार्य समाधानकारक असले तरी पूवरेत्तर राज्य, सागरी मार्ग व द्वीपसमूहाच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी सैनिक वाढवण्याची गरज आहे.

राममंदिरावर अप्रत्यक्ष भाष्य

काही विषयांवरील निर्णय संवादातून व्हायला हवेत. यामुळे समाजात प्रेम, आपुलकी व विश्वास कायम राहतो. काही प्रकरणांचा निकाल न्यायालयातून लागेल. निर्णय कोणाच्याही पक्षाने लागला तरी इतरांची मने दुखावणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. दोन्ही समूहाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायला हवे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी राममंदिराचे नाव न घेता केले. कायद्याच्या चौकटीत राहून हे कार्य व्हायला हवे. पण, गरज पडली तर सत्तेतील स्वयंसेवकाने नवीन कायदाही करावा, अशी संघाची इच्छा असल्याच्या सूचना यावेळी करण्यात आली.

आर्थिक मंदीवर इतकी चर्चा का?

एका अर्थशास्त्रज्ञानुसार, आर्थिक मंदीचा दर शून्य गाठेल तर चिंता करण्याची आवश्यकता आहे. जीडीपीचा दर आता ५ वर असल्याने घाबरण्याची गरज नाही. पण, या बाबीवर मोठय़ा प्रमाणात चर्चा करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. जागतिक स्तरावरील व्यापारी स्पध्रेमुळे आर्थिक मंदीचा दर कमी-अधिक होऊ शकतो. जीडीपी हे आर्थिक मंदीचे योग्य मानक नसल्याचे आजवर अधोरेखित झाले आहे. मंदीचा विचार करून सरकारने काही पावले उचलली असून लवरकच त्याचे परिणाम दिसतील, असा विश्वास व्यक्त करीत सरसंघचालकांनी यावेळी स्वदेशीवर भर देऊन विदेशी आर्थिक गुंतवणूक ही स्वत:च्या अटींवर स्वीकारावी, अशा सूचना केली.

देशविकासासाठी लोकचळवळ हवी – नाडर

देशाचा विकास करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांनी आंदोलन उभारले होते, तशाचप्रकारे विकासाकरिता लोकांनी चळवळ उभी करावी, असे अवाहन एचसीएल समूहाचे अध्यक्ष शिव नाडर यांनी केले. आज देशाची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात असून जवळपास ६० कोटी लोकसंख्या २५ वष्रे वयोगटातील आहे. ही भारताची संपत्ती असून त्याची योग्यपणे गुंतवणूक केल्यास भारताचा विकास दूर नाही, असेही ते म्हणाले.

इमरान खानला  टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमी हिंदूराष्ट्राचा विचार व्यक्त करतो. हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ स्वत:ला हिंदू समजणारे नव्हे. हिंदू शब्दाची व्याख्या मोठी असून यात वेगवेगळ्या धर्माचे, भाषा, खाणपान असणाऱ्या सर्वाचा समावेश होतो. देशाच्या विकासासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक भारतीय हा हिंदू असून त्या शब्दप्रयोगामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे संघ व भारताविषयी गरळ ओकून बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. पण, त्यांना यश येत नाही, असेही भागवत म्हणाले.