जोपर्यंत समाजात भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण कायम असले पाहिजे. ज्या दिवशी आरक्षण नको असे त्यांना वाटेल त्या दिवशी ते ते बंद होईल, असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणाचे समर्थन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या जन्मशताब्दी निमित्त नागपूर नागरिक बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत डॉ. भागवत ‘सामाजिक समरसता’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, उपाध्यक्ष राजेश लखोटिया उपस्थित होते.
बिहारमध्ये झालेल्या एका भाषणात डॉ. भागवत यांच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून देशात वाद निर्माण झालेला असताना त्यांनी आज सामाजिक समरसता या विषयावर बोलताना आरक्षणासंदर्भात संघाची भूमिका स्पष्ट केली. बिहारमध्ये झालेल्या भाषणात हीच भूमिका मांडली असताना त्याचा अर्थ वेगळा काढण्यात आला होता.
जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे हीच संघाची भूमिका राहिली आहे. ती आजही कायम असल्याचे डॉ. भागवत म्हणाले.
आरक्षणामुळे कोणावर अन्याय होता कामा नये. असे असले तरी समाज एकसंघ राहिला पाहिजे, ही भूमिका आणि विचार मांडला गेला पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यातही धर्मात विभागणी केली आहे, असेही ते म्हणाले.