राज्यात २५ शहरातील ७२ प्रदूषण मापन केंद्राद्वारे १०,१६४ नमुन्यांचा अभ्यास करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१८-१९ वर्षांचा प्रदूषण अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात पुन्हा चंद्रपूर, सायन, बांद्रा, डोंबिवली ही शहरे अतिप्रदूषित असल्याचे म्हटले आहे. राज्यात धूळ प्रदूषणात चंद्रपूर प्रथम मुंबई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बेंझिनचे प्रमाण नागपूर, चंद्रपूर, डोंबिवली परिसरात अधिक आढळले आहे. उपरोक्त अहवालात बहुतेक सर्वच केंद्रात धूलिकण प्रदूषण वाढल्याचे म्हटले आहे. २०१७-१८ च्या तुलनेत यावर्षीचे ६५ टक्के (६९९६) नमुने हे चांगल्या श्रेणीत तर ३५ टक्के नमुने हे धोकादायक श्रेणीत आहेत. गेल्या ८ वर्षांपासून औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, डोंबिवली, बांद्रा, ऐरोली, पुणे आणि सोलापूर येथे वायूप्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रदूषणात एसओ, एनओ, आरएसपीएम, ओझोन, बेन्झिन, सीओ प्रदूषकांचा समावेश आहे. सल्फरडाय ऑक्साईडचे प्रदूषण महाराष्ट्रात कमी असले तरी मुंबई ,पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यत जास्त आहे. नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रदूषण मुंबई परिसर, सोलापूर, पुणे, बदलापूर, उल्हासनगर येथे जास्त आहे. ओझोन प्रदूषण अनेक शहरात मर्यादेत असले तरी औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, नागपूर व चंद्रपूर येथे अधिक आहे. कार्बन मोनोऑक्साईडचे प्रदूषण बांद्रा, पुणे, नागपूर, सोलापूर येथे मर्यादेपेक्षा जास्त आढळले. औद्य्ोगिक प्रदूषण, डिझेल, पेट्रोल, गेस, कोळसा ज्वलन, वाहनांची वाढती संख्या, बांधकामे, वाहतूक, कचरा जाळणे इत्यादी कारणांमुळे प्रदूषण वाढते. प्रदूषणामुळे १.२ मिलियन लोक मृत्युमुखी पडतात, असा निष्कर्ष ग्लोबल इअर २०१९ च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील २० प्रदूषित शहरात भारतातील १४ शहरे येतात, असे म्हटले आहे. प्रदूषणामुळे डोके, गळा, नाक, फु फ्फुस, श्वसन नलिकेचे आजार होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, मानसिक आजार, जनन क्षमतेवर परिणाम आणि कर्करोग यासारखे आजारही होतात. - प्रा सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक, चंद्रपूर, अध्यक्ष ग्रीन प्लानेट सोसायटी