नागपूर : दारू आणि अंडाकरीचा बेत आखल्यानंतर जेवण बनवण्यास नकार दिल्यामुळे युवकाने मित्राचा दगडाने ठेचून खून केला. असा थरारक उलगडा बनारसी हत्याकांडातील आरोपीने केला असून पोलीसही अवाक् झाले आहेत. शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला मानकापूर पोलिसांनी अटक केली. गौरव ऊर्फ निक्की शैलेंद्र गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुR वारी मध्यरात्री मानकापूर पोलिसांना युवक गोधनी रोडवर श्रीकृष्ण ऑटो गॅरेजच्या बाजूला पडलेला असल्याचे कळले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.  याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चौकशी केली. बनारसीचा खून केल्यानंतर निक्की वस्तीतून पळून गेला.  दरम्यान कपडय़ाची पिशवी भरून त्याने गणेशपेठमधील मध्यवर्ती बसस्थानक गाठले. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.