‘बीएसएनएल’च्या महाव्यवस्थापक नम्रता तिवारी यांची माहिती नागपूर जिल्हा आता पूर्णपणे डिजिटल झाल्याची घोषणा भारत संचार निगम (बीएसएनएल) नागपूरच्या महाव्यवस्थापक नम्रता तिवारी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली. बीएसएनएल कंपनीने जिल्ह्य़ात असलेल्या सर्व ७७६ ग्रामपंचायतींपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचविण्याचे काम पूर्ण केले असून देशातील पहिला डिजिटल जिल्हा असल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची संकल्पना आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हा डिजिटल करण्याची जबाबदारी बीएसएनएलकडे दिली. नागपूर देशातील पहिला डिजिटल जिल्हा व्हावा यासाठी सर्व सुविधा दिल्या. या योजनेत ग्रामीण भागात राहणाऱ्यांना इंटरनेट सुविधांचा लाभ मिळावा त्या दृष्टीने दोन वर्षांपूर्वी बीएसएनएलने ऑप्टीकल फाइबर केबल टाकण्याचे काम जिल्ह्य़ात सुरू केले. जवळपास १३ तहसीलमध्ये येत असलेल्या ७७६ ग्रामपंचायतीपर्यंत केबल पोहोचविण्यासाठी १६०० किलोमीटरवर केबल टाकण्यात आले. यामुळे आता नागपूर जिल्हा भारताच्या डिजिटल नकाशावर आला असून ‘इन्फॉमेशन सुपर हायवे’शी जोडला आहे. आता जिल्ह्य़ात राष्ट्रीय ऑप्टीकल फायबर नेटबर्कव्दारे सर्व ग्रामपंचायतीला तीव्र गतीने इंटरनेट सुविधा प्राप्त झाली आहे. यामुळे ग्रामपंचायतसह, गावातील दवाखाने, शाळा, गावातील अन्य संस्था अथवा वैयक्तिकरीत्या सर्वाना इंटरनेटची सुविधा मिळणे शक्य झाले आहे. शहरातील नागरिकांना मिळणारी इंटरनेची गती आता जिल्ह्य़ातील सर्व गावात पोहोचवण्यासाठी सरकारने बीएसएनएलला तब्बल तीस कोटी रुपये दिले होते. बीएसएनएलचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीकडून नागपूर जिल्ह्य़ासाठी इंटरनेटसाठी विशेष योजना देखील देण्यात आली आहे. यात एक जीबीचा डेटा केवळ चार रुपयांत डाउनलोड करता येणार आहे. ऑप्टीकल फायबर केबलमुळे तीव्र गतीच्या इंटरनेट सुविधेत जिल्ह्य़ात जवळपास ६०० जीबीचा डेटा आता केवळ ३ मिनिटात डाऊनलोड करणे शक्य झाले आहे. दिलेली विशेष ऑफर ही ९० दिवसांकरिता मर्यादित असणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्य़ातदेखील याचे काम सुरू असून नागपूरने यात आघाडी घेत सर्वप्रथम काम पूर्ण केले आहे, असेही तिवारी यांनी सांगितले. नागपूरकरांसाठी विशेष ‘ऑफर’ देशातील पहिला डिजिटल जिल्हा होण्याचा मान पटकावल्यामुळे दूरसंचार विभागातर्फे नागपूरकरांना विशेष ‘ऑफर’ देण्यात आली आहे. या अंतर्गत विविध ‘टॅरिफ प्लॅन’चा पर्याय देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात एक जीबी पर्यंतचा डाटा केवळ चार रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर या योजने अंतर्गत ४० एमबीपीएस ते १०० एमबीपीएस स्पीड करता विविध दर ठेवण्यात आले आहे. ९० दिवसांपर्यंत जिल्ह्य़ातील ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. डिजिटल कनेक्शनसाठी ग्राहकांना (FTTH व मोबाइल क्रमांक) असा संदेश ५४१४१ या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे.