नागपूर ही संघभूमी नसून, दीक्षाभूमी आहे. संघभूमी म्हणून नागपूरला बदनाम केले जात असल्याचे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेते कन्हैया कुमार याने गुरुवारी म्हटले आहे. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्याला नागपूरला येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. १४ एप्रिलला आपण नागपूरला येतच राहणार, असेही सांगितले.
देशातील शोषितांवर, वंचितांवर अन्याय होत असल्याचे त्यांना जाणवू लागल्याने त्यांच्याकडून आता आझादीच्या घोषणा देण्यात येत असल्याचे कन्हैया यावेळी म्हणाला. आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्याने सांगितले. कन्हैयाने दीक्षाभूमीवर जाऊन जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनही केले.
दरम्यान, कन्हैया कुमार यांच्या गाडीवर गुरुवारी सकाळी नागपूरमधील विमातळाबाहेर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत कन्हैया कुमारला घेऊन निघालेल्या गाडीचे नुकसान झाले असून, तो सुखरूप आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याची माहिती मिळाली असून, पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.