राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या वाघांच्या संशयास्पद मृत्यूंनी वनखात्यासमोर आव्हान उभे केले आहे. बहेलिया शिकाऱ्यांचे मोठे आव्हान पेलणाऱ्या वनखात्याला स्थानिक शिकाऱ्यांवर मात्र अजूनही नियंत्रण मिळवता आलेले नाही. परिणामी, भारतातील एकमेव वीजरहित जंगल अशी ओळख असलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प अजूनही शिकाऱ्यांचे लक्ष्य ठरत आहे.

राज्यात गेल्या १५ दिवसात दोन वाघांचे संशयास्पद मृत्यू झाले. याशिवाय महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या वाघिणीचा शोध अजूनही लागलेला नाही. आठ दिवसांपूर्वी नवेगाव वनविभागात वाघाचे अवयव मिळाले. तब्बल १५ दिवसांपूर्वी या वाघाची शिकार झाली तरीही स्थानिक प्रशासनाला याचा पत्ता लागला नाही. २०१२-१३ पासूनच नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प शिकाऱ्यांच्या रडारवर आहे. आधी बहेलिया आणि आता स्थानिक शिकाऱ्यांचा धुमाकूळ सुरू आहे. परिसरातीलच काही गावांमधून शिकारीची सूत्रे हलतात हे ठाऊक असतानासुद्धा वाघाचा मृत्यू प्रादेशिकमधला की वन्यजीव क्षेत्रातला यातच यंत्रणा अडकली आहे. आठ दिवसांपूर्वी मृत्युमुखी पडलेला वाघ गावाच्या सीमेवर दिसल्याची माहिती स्वयंसेवींनी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवडय़ात प्रशासनाला दिली होती. त्यानंतरही व्यवस्थापन अपयशी ठरले.  २०११-१३ या कालावधीत नागझिरा लँडस्के पमधील नागझिरा आणि नवीन नागझिऱ्यात प्रत्येकी चार तर कोका अभयारण्यात एका वाघाचा अधिवास होता. २०१३ मध्ये बहेलियांनी चार वाघांची शिकार केली. २०१६ मध्येही  चार वाघांची शिकार झाली. २००४ ते २०१० या कालावधीत ११ ते १२ वाघांची नोंद होती. त्यानंतर ती अर्ध्याहून अधिक कमी झाली. आता या व्याघ्रप्रकल्पात नागझिरा लँडस्के पमध्ये सहा तर नवेगाव लँडस्के पमध्ये दोन अशा आठ वाघांची नोंद आहे. या व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढत असताना कमकु वत देखरेख यंत्रणेमुळे वाघांच्या शिकारीचे सत्र सुरू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या लँडस्के पमध्ये वाघ सुरक्षित ठेवायचे असतील तर व्यवस्थापनाला  देखरेख यंत्रणा बळकट करावी लागेल, असे मत वन्यजीवतज्ज्ञ व गोंदिया जिल्ह्य़ाचे माजी मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांनी व्यक्त केले.

वाघांचा माग..

आठ दिवसांपूर्वी झालेली वाघाची शिकार ही गोंदिया वनविभागाच्या अखत्यारितली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील वाघांवर कॅ मेरा ट्रॅपच्या माध्यमातून आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक मनिकं दा रामानुजम यांनी सांगितले.

घटनाक्रम.. : २००५ मध्ये ‘माई’नावाच्या वाघिणीचा नर बछडा बेपत्ता झाला. २००७ मध्ये उत्तराखंडमध्ये पकडल्या गेलेल्या वाघाचे कातडे याच बछडय़ाचे असल्याचे स्पष्ट झाले. २००९ मध्ये याच वाघिणीचा मादी बछडा वीजप्रवाहाने मंगेझरीत मारला गेला. त्याचवेळी आणखी एका बछडय़ाची शिकार झाली होती. २०१५-१६ मध्ये कोका वनक्षेत्रात वीजप्रवाहाने वाघ मारले गेले. या धोक्याची माहिती त्यावेळीही संबंधित व्यवस्थापनाला देण्यात आली होती. व्यवस्थापनने दुर्लक्ष केले आणि चार वाघांचा बळी गेला. त्यानंतरही वाघांचे बेपत्ता होणे सुरूच असताना व्यवस्थापन मात्र त्यांची देखरेख यंत्रणा अद्ययावत असल्याचा दावा करत आहेत.