नाना पटोले यांची मागणी नागपूर : करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यात लस प्रभावी ठरत असल्याचे विविध देशातील लसीकरणावरून दिसत आहे. महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. परंतु राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधामुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने घरोघरी जाऊन करोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे संख्येने कमी व दूर अंतरावर असल्याने प्रवास करून केंद्रावर जाऊन लस घेणे लोकांसाठी जिकरीचे ठरत आहे. १ मे नंतर तर १८ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण केले जाणार आहे. त्यावेळी लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करून ‘घरोघरी जाऊन करोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम’ राज्य सरकारने हाती घ्यावी. पोलिओ या महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशपातळीवर मोठय़ा प्रमाणात अशीच मोहीम राबवण्यात आली होती. याच धर्तीवर घरोघरी जाऊन करोनाची लस दिली तर करोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश येईल, असे पटोलेंनी म्हटले आहे.