देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणारे सैनिक कुठल्या परिस्थितीत लढतात, याचे भान आम्हाला असले पाहिजे. सैनिकांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा त्यांचा सन्मान करत त्यांच्यासारखे देशभक्त कसे होता, येईल याचा विचार करा, असे आवाहन लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अनुराधा प्रभूदेसाई यांनी केले. चिटणवीस सेंटरमध्ये मंथन या कार्यक्रमांतर्गत अनुराधा प्रभूदेसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. प्रभूदेसाई यांनी कारगिल युद्धाची माहिती देताना भारतीय सैनिकांचे पराक्रम युवकांना सांगितले. देशातील राजकारण कुठल्या दिशेला चालले आहे हे नुकतेच वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानातून सुटका होण्याच्यावेळी अनुभवले. कुठल्या मानसिकतेतून तो पाकिस्तानातून आला हे जाणून घेण्यापेक्षा त्या ठिकाणी ढोलताशे वाजवण्यात आले. आपल्याकडे वेळेचे महत्त्व नाही. मात्र, लष्करामध्ये एका एका सेंकदाचे महत्त्व असते हे त्यांनी सोदाहरण सांगितले. यावेळी प्रभूदेसाई यांनी लेह लद्दाख, जम्मू काश्मीरसह देशाच्या सीमेवर लढणाऱ्या विविध स्थळांची माहिती दिली.