राम भाकरे

सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित ५९ वी राज्य नाटय़ हिंदी नाटय़ स्पर्धा मुंबई वगळता नागपूर, ठाणे व पुणे केंद्रावर पार पडली. परंतु करोनामुळे मुंबईत स्पर्धा झाली नाही. आता मुंबईला वगळून  या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी  केली जात आहे. परंतु मुंबईच्या नाटय़ संस्थांनी मात्र त्यास विरोध केला आहे. संचानलयाकडे तीनही केंद्रातील नाटय़ संस्थांनी या संदर्भात निवेदन दिल्यामुळे संचालनालयाची डोकेदुखी वाढली आहे.

सध्या मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव बघता तेथे नाटय़ स्पर्धा पाच ते सहा महिने  होण्याची शक्यता नाही. तर दुसरीकडे तीनही केंद्रांवर  ६०नाटके सादर झाली आहेत. म्हणजे, जवळपास ८० टक्के स्पर्धा पूर्ण झाली आहे. त्यामुळे स्पर्धेचा निकाल जाहीर करावा, अशी मागणी ठाणे, पुणे व नागपुरातील नाटय़ संस्थांनी सांस्कृतिक संचालनालयाकडे केली आहे. मात्र मुंबईच्या नाटय़ संस्थांनी त्यास विरोध केला आहे.

जोपर्यंत मुंबईच्या नाटय़ संस्थांची नाटके सादर होत नाही तोपर्यंत निकाल जाहीर करू नये, अशी भूमिका तेथील कलावंतांनी घेतली आहे.

यंदाही अनिश्चितता

यावर्षीही  हौशी व व्यावसायिक नाटय़ स्पर्धेवर करोनाचे सावट आहे. साधारण जून जुलैमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाते. परंतु यावेळी संचालनालयाकडून  कुठलाच आराखडा तयार नाही. त्यामुळे यावर्षीच्या स्पर्धेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. शिवाय जूनमध्ये होणारा राज्य नाटय़ स्पर्धेचा पारितोषिक कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आल्याचे संचालनालयाने कळवले आहे.

निकालाबाबत तीनही केंद्रावरील नाटय़ संस्थांचे निवेदन मिळाले आहे. मात्र मुंबईच्या नाटय़ संस्थांनी विरोध केला आहे. त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि त्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल. यावर्षीच्या राज्य नाटय़ स्पर्धेसह पारितोषिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला जातो. यावेळी मात्र शासनाच्या आदेशानंतर त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

– विभिषण चावरे, संचालक, सांस्कृतिक संचालनालय.