सदर, अजनी चौकात आवाज अधिक, सिव्हिल लाईन्स धरमपेठेत मर्यादित

दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे उपराजधानीतील अनेक भागात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ध्वनी प्रदूषणात वाढ  झाली आहे, तर त्याचवेळी शहरातील काही भागात ध्वनी प्रदूषण कमी देखील झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी दिवाळीच्या पाच दिवसातील ध्वनी प्रदूषणाचा अहवाल जाहीर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर कालमर्यादा घातल्यानंतरही त्याचे पालन कुठेच झाले नाही, हे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी दिवाळीतील पाच दिवसांच्या तुलनेत यावर्षी अजनी चौक तसेच सदर परिसरात फटाक्यांचा आवाज प्रचंड वाढलेला होता, तर सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, इतवारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, देशपांडे लेआऊट, शंकरनगर, महाल या परिसरात आवाजाची पातळी कमी-अधिक होती. दिवाळीच्या दोन दिवसाची तुलना यात करण्यात आली आहे. १९ ऑक्टोबर २०१७ची तुलना ७ नोव्हेंबर २०१८ सोबत आणि २१ ऑक्टोबर २०१७ची तुलना ९ नोव्हेंबर २०१८ या दिवसाशी करण्यात आली आहे. याशिवाय दिवसा आणि रात्री फोडल्या गेलेल्या फटाक्यांचा आवाज यात नोंदवण्यात आला आहे. अजनी चौकातील  दिवसाचा फटाक्यांचा आवाज गेल्यावर्षीच्या तुलनेत सहा डेसिबलने वाढला तर रात्रीचा आवाज सात डेसिबलने वाढला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवाजाची मर्यादा व्यावसायिक क्षेत्रात ६५ डेसिबल, निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल तर शांतता क्षेत्रात ५० डेसिबल इतकी ठरवून दिली आहे. मात्र, मंडळाने जाहीर केलेली आकडेवारी पाहता बहुतांश ठिकाणी आवाजाची मर्यादा ओलांडली गेली आहे. याव्यतिरिक्त अहवालात मागील आणि यावर्षीची तुलना केली असली तरीही व्यावसायिक, निवासी आणि शांतता क्षेत्र अशी विभागणी केलेली नाही.

वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीजवळ

सोमवारी पंचमीच्या दिवशी वायू प्रदूषणाबाबत घेतलेल्या आढाव्यात शहराची वायू प्रदूषणाची पातळी धोक्याच्या अतिशय जवळ आहे. साधारपणे वायू गुणवत्ता निर्देशांक २००पेक्षा अधिक झाला, तर धोक्याचा समजला जातो. याठिकाणी तो १७४ इतका आहे. तरीही यात केवळ एकाच आणि शांत समजल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्स परिसराचाच समावेश आहे. शहरातील पाचही स्थानकाची माहिती घेतली असती तर वायू प्रदूषणाच्या निर्देशांकाने धोक्याची पातळी ओलांडलेली दिसून आली असती.