स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील राज्यातील १६४ नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत एकूण ३३ हजार ५३३ मतदारांनी मतदानासाठी नकाराधिकाराचा (नोटा) पर्याय निवडला आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंतीस नसेल तर मतदारांना त्यांचा नकाराधिकाराचा हक्क बजावण्याचा पर्याय ‘नोटा’च्या माध्यमातून निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे.

निवडणुका या राज्यपातळीवरील प्रश्नांवर लढविल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्न महत्त्वाचे ठरतात. रिंगणात असलेले उमेदवारही मतदारांचे परिचित असतात. उमेदवारांची संख्याही अधिक असल्याने निवडीचे पर्यायही उपलब्ध असतात. या पाश्र्वभूमीवर १६४ पालिकांमध्ये नकाराधिकाराचा वापर करणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय ठरते. या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांचा पक्ष, उमेदवार याबाबत मतदांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. तरीही प्रत्येक ठिकाणी नकाराधिकाराचा वापर झाला आहे.

nota-chart

पालिका निवडणुकीतील मतदानाचा लेखाजोखा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीत एकूण ३३ हजार ५३३ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पुणे विभागात ८९५३ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. भाजपला ज्या भागात घवघवीत यश मिळाले त्या विदर्भातील नागपूर विभागात १८७१ आणि अमरावती विभागात ७४१६ मतदारांनी नकाराधिकार वापरला. कोकणात ही संख्या २५४३ इतकी आहे.