यापुढे टायिपगची परीक्षा संगणकावरच होणार कृष्णधवल चित्रपटकाळातील अधिकांश चित्रपटात टंकलेखन यंत्रावर खडखडणारी बोटे ही त्या चित्रपटाची ओळख होती. काळ बदलला आणि रंगीत चित्रपटाचे युग अवतरले. संगणकाच्या युगात ही खडखड ऐकू येणार नाही, असे वाटत असले तरीही ही बोटे न्यायालय परिसरातील दृश्यात कायम होती. मात्र, खडखडणारा हा आवाजच आता कायमचा बंद होणार आहे. न्यायालय परिसरात का होईना टंकलेखनाची ही खडखड थोडीफार शाबूत होती, पण राज्य परीक्षा परिषदेने हे यंत्रच हद्दपार करण्याचा निर्णय घेतल्याने उद्या, बुधवारी राज्यात होणारी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अखेरची परीक्षा असेल. काही वर्षांत शासकीय, निमशासकीय कार्यालयातून टंकलेखन यंत्र काळाच्या गरजेनुसार हद्दपार होत गेले. भल्यामोठय़ा त्या यंत्राची जागा संगणकाने व्यापली. तरीही न्यायालय परिसर आणि काही ठिकाणी होणारा त्याचा वापर यामुळे टंकलेखन संस्थेत त्याचे वर्ग सुरूच होते. मात्र, तेथीलही हे यंत्र आता अधिकृतरीत्या हद्दपार होणार आहे. राज्यात सर्व टंकलेखनाच्या परीक्षा संगणकावर घेण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर संगणकावरील एक परीक्षाही पार पडली असून यापुढे विद्यार्थ्यांना टंकलेखनाच्या परीक्षा संगणकावरील की-बोर्डवर द्याव्या लागणार आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार टंकलेखन यंत्रावरील परीक्षा नोव्हेंबर २०१५ मध्येच बंद होऊन संगणक टंकलेखन सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती. ती आता संपुष्टात येत असल्याने आज, मंगळवारपासून सुरू झालेली परीक्षा टंकलेखन यंत्रावरील शेवटची परीक्षा ठरेल. संगणकावरील टंकलेखनासाठी परीक्षा परिषदेने टंकलेखन संस्थेलाच संगणक टंकलेखनाचा परवाना दिला आहे. त्यानुसार तीन हजार संस्थांपकी २ हजार २०० संस्थांनी संगणक टंकलेखन सुरू केले आहे. सरकारी, निमसरकारी अशा सर्वच कार्यालयात संगणकाचा वापर वाढल्याने ही परीक्षा संगणकावरच हवी, अशी मागणी होती. शिवाय, टंकलेखन यंत्र इतिहासजमा होत असल्याने दुरुस्तीच्या वेळी त्याच्या सुटय़ा भागांचा प्रश्न, तसेच त्यासाठी बराच खर्च लागतो आणि कुशल कारागीरही मिळत नाही. हे सारे लक्षात घेऊन संगणकावर परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. परीक्षा ऑनलाईन होणार राज्य परीक्षा परिषदेतर्फे १७ एप्रिल २०१६ रोजी प्रायोगिक तत्त्वावर टंकलेखन ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या. तेव्हा खाजगी संस्थाचालकांकडून त्याचा विरोधही झाला. टंकलेखन संस्थाचालकांकडून परीक्षेसाठी मिळालेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा मोठा प्रकार सुरू होता. यात परीक्षेला बसलेले विद्यार्थी पशांच्या बळावर अधिकचा वेळ विकत घेऊन उत्तीर्ण व्हायचे. मात्र, जेव्हा उत्तीर्ण विद्यार्थी नोकरी मिळविण्यासाठी जायचा तेथे तो अनुत्तीर्ण व्हायचा. त्यामुळे या प्रकारात विद्यार्थ्यांचे नुकसान अन् संस्थाचालकांचा मोठा फायदा होत होता. नेमका हाच प्रकार थांबवण्यासाठी अथवा विद्यार्थीहित लक्षात घेता यापुढे टंकलेखनाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. राज्यातून ३.५० लाख विद्यार्थी परीक्षेला सर्व क्षेत्रात संगणकचा मोठा वापर होत असल्याने राज्य परीक्षा परिषदेने टंकलेखन यंत्रावरील परीक्षा हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २०१५ चा असून दरम्यानच्या काळात याला मुदतवाढ देण्यात आली होती. गेल्या एप्रिलमध्ये आम्ही प्रायोगिक तत्त्वावर संगणकावर एक परीक्षा घेतली तेव्हा १० हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यंदा राज्यातून साडेतीन लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होईल. - गंगाधर मनमाने, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद