टाळेबंदीचा फटका; दोनवेळच्या जेवणाचीही भ्रांत] लोकसत्ता प्रतिनिधी,

नागपूर : शहरात ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी  लागल्याने सर्व बाजारपेठा कडकडीत बंद  आहेत. यामुळे तब्बल दहा लाख कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली असून त्यांची रोजंदारी बंद झाली आहे. अशात दोन वेळच्या भोजनासह इतर खर्च कसा भागणार, या विवंचनेत कामगार पडले आहेत.

शहरात करोनाच्या वाढत्या मृत्यूदरासह रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने तब्बल ३० एप्रिलपर्यंत  गर्दी होईल अशी सर्व ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका रोजंदारीच्या कामावर जाणाऱ्या कामगारांवर बसला आहे.  दररोज दोनशे ते चारशे रुपये कमावणाऱ्या कामगारांच्या हातचा रोजगार  गेला आहे. शहरातील इतवारी, गांधीबाग, सराफा बाजार, कपडा मार्केट, मालवाहतूक केंद्र, विविध उत्पादनाचे केंद्र मॉल, रेस्टॉरेंट विविध दुकानांमध्ये काम करणारे असे आदी असे सुमारे दहा लाख कामगार दरोज काम करतात. मोठ्या बाजारपेठेत जवळपास दहा ते वीस हजार कामगार असतात. मात्र सद्या बाजारपेठा बंद असल्याने ते घरी बसले आहेत. बाजारपेठा बंद असल्याने मालवाहतुकीच्या कामावर जाणाऱ्या कामगारांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. एकट्या कपडा मार्केटमध्ये तब्बल पंधरा हजार कामगार काम करतात. कपडा बाजारही बंद असल्याने ते घरी बसले आहेत. मात्र टाळेबंदीमुळे त्यांची बिकट परिस्थिती झाली आहे. व्यापारी म्हणतात, पहिल्या टाळेबंदीच्या वेळी आम्ही काही प्रमाणात आमच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना दोन महिन्यांचा पगार मदतीच्या स्वरूपात दिला होता. मात्र आता आमचीही जमापुंजी संपुष्टात आल्याने त्यांना वेतन देणे शक्य नाही. त्यामुळे टाळेबंदी सरकारने त्वरित मागे घ्यावी.