सर्वसामान्यांच्या खिशावर भार 

एकीकडे कांद्याने सर्वाच्या डोळ्यात पाणी आणले असताना आता बटाटय़ाचे दरही हळूहळू वाढत आहेत. गेल्या आठवडय़ात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटय़ाचा घाऊक भाव ६०० रुपये प्रतिचाळीस किलो असा होता. मात्र या आठवडय़ात बटाटय़ाची खरेदी ७५० रुपयांवर गेली आहे. त्यामुळे कांद्यानंतर बटाटाही महागत असल्याचे चित्र आहे.

यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे आर्थिक समीकरण बिघडवले. त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात चाळीस रुपये किलो मिळणारा कांदा शंभरच्या पार गेला आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने कांद्याचे दर दोन आठवडय़ात ६० रुपयांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामन्यांना सहन करावा लागत असून गृहिणींचे बजट बिघडले आहे, तर दुसरीकडे आता बटाटय़ाचे दरही वाढले आहे. गेल्या आठवडय़ात ठोक बाजारात बटाटे १० ते १२ रुपये प्रतिकिलो होते, तर किरकोळ बाजारात बटाटे १८ रुपये विकल्या गेले. मात्र आता घाऊक बाजारात बटाटा १८ रुपयांवर गेला असून किरकोळ बाजारात तो २५ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. मागणीच्या तुलनेत बटाटा कमी येत असल्याने ही दरवाढ झाली आहे. नागपूरच्या बाजारात आग्रा, कानपूर, सिरसागंज, इटवा येथून बटाटा येतो. बाजार समितीत दररोज १५ ते २० ट्रक माल येतो. मात्र आता आवक १० त १२ ट्रकवर आली आली आहे. त्याशिवाय राज्यातील धुळे, अहमदनगर येथूनही बटाटा नागपूरच्या बाजारात येतो. मात्र परतीच्या पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा बटाटा सडला आहे. अशात इतर राज्यातून बटाटा नागपूरच्या बाजारात येत असल्यानेही भावात वाढ झाली आहे. नवा बटाटा येण्यास अवकाश असल्याने बटाटय़ाचे भाव कमी होण्यास अजून काही काळ लागेल असे कळमना मार्केट येथील कांदा बटाटा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वासाणी यांनी सांगितले. कांद्यानंतर बटाटा महाग झाल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाकगृहाचे बजेट कोलमडणार आहे.