पानमळ्यासाठी अनुदान, बाजारासाठी स्वतंत्र जागेची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात सर्व दूर पसरलेल्या बारी समाजाचा विकास करायचा असेल तर प्रथम समाजबांधणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरच समाजाची जनगणना करणार असल्याचा संकल्प बारी समाज संघटना, नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

‘लोकसत्ता’च्या ‘समाजमत’ व्यासपीठावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी व नागरिकांशी चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सत्येन दाढे, सचिव विष्णू दाव्‍‌र्हेकर, जितेन दाढे, चंद्रहास दाढे व हर्ष दातीर उपस्थित होते. या समाजाला पुरातन इतिहास आहे. पातळलंकेच्या राजाने त्याच्या कन्येच्या विवाहात तिला ज्या बहुमोल भेटवस्तू दिल्या होत्या, त्यात नागवेलीची पाने होती. रानेधर यांच्या प्रबंधकोषात याचा उल्लेख आहे. इ.स. ४७३ मध्ये सुद्धा पानाचा विडा अस्तित्वात होता.

विडय़ासाठी लागणाऱ्या पानांचे मळे लावणारा समाज म्हणजेच बारी समाज. पानात आयुर्वेदिक गुण असल्याने त्याचे जेवणानंतर हमखास सेवन केले जात होते. त्याच्या मोठय़ा व्यापारपेठा नागपूर, रामटेक व विदर्भाच्या विविध भागात होत्या. कालांतराने तंबाखूमिश्रित सुपारीचा वापर वाढला आणि पानाचा विडा मागे पडला. त्यामुळे पानमळे लावणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. पावसामुळे त्याचे नुकसान झाले तरी मदतीस टाळाटाळ होऊ लागली.

नागपुरात पान विक्रेत्याकडून त्यांची जागा काढून घेण्यात आली. अशा अनेक अडचणी समाजापुढे आहेत. त्या सोडवायच्या असतील तर प्रथम समाजाला एकत्र करावे लागेल. जनगणनेच्या माध्यमातून समाजाचा डेटा तयार केला जाईल व त्या आधारावर पुढचा संघर्ष करू, असे सत्येन दाढे आणि विष्णू दाव्‍‌र्हेकर म्हणाले.

बदलत्या काळानुरूप समाजही बदलला, मुले, मुली उच्चशिक्षित झाली. वेगवेगळ्या पदावर ते सध्या कार्यरत आहेत. त्यांचा समाजबांधणीस हातभार कसा लागेल यादृष्टीने संघटनेचे आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनगणनेची माहिती  समाजाच्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे,  समाजाचे संकेतस्थळ, फेसबुक पेजवर यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, असे यावेळी सांगण्यात आले. समाजातर्फे दरवर्षी उपवर वधू-वर परिचय मेळावा घेतला जातो. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील समाजबांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.  याशिवाय विविध स्पर्धाही घेतल्या जातात. गुणवंत विद्यार्थी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला जातो. समाज एकीकरणाच्या प्रयत्नाचा हा भाग असल्याचे दाढे यांनी स्पष्ट केले. राजकीय नेतृत्वाचा अभाव महाराष्ट्रात समाजाची लोकसंख्या काही लाखांमध्ये आहे. विदर्भात आकोट, बडनेरा या दोन

मतदारसंघासह यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्य़ातील काही मतदारसंघात बारी समाजाची लोकसंख्या निवडणुकीत निर्णायक ठरणारी आहे. मात्र आतापर्यंत समाजाचे फक्त दोघे  नानासाहेब ताजने (दिग्रस) रामदास बोडखे (अकोट) आमदार होऊ शकले. त्यामुळे समाजबांधणीनंतर राजकीय दबाव तयार करून नेतृत्व घडवण्याचे काम संघटना करेल, असे दाढे म्हणाले.

विविध उपक्रमांचे नियोजन

पानाच्या विडय़ाला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी या व्यवसायाचे आधुनिकीकरण करणे, युवकांना रोजगारविषयक प्रशिक्षण देणे, बाहेरून येणाऱ्या मुलांसाठी नागपुरात वसतिगृह बांधणे, समाजभवनासाठी सरकारकडून जागा मिळवणे, आदी उपक्रम पुढच्या काळात राबवले जाणार आहेत.

तांडापेठ ही पानमळ्याची जागा

नागपूरमध्ये तांडापेठ या भागात समाजाची मोठी लोकवस्ती होती. तेथे पानमळे लावले जात होते. १९५२ मध्ये नागपूर सुधार प्रन्यासने त्यांच्या बिनाकी योजनेसाठी ही जागा अधिग्रहीत केली. बारी समाजाचे तांडे येथे राहात असल्याने या जागेला तांडापेठ असे नाव पडले, असे सत्येन दाढे यांनी सांगितले.