ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी केवळ वनखात्याचीच नाही, तर त्यात लोकसहभागसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. माळढोक, सारस यासारखे पक्षी शेतात घरटी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशावेळी वनखाते आणि शेतकरी यांच्यातला दुवा असलेल्या स्वयंसेवीची भूमिकासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. माळढोक आणि भारतीय राखी धनेश पक्ष्यांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी लोकसत्ताला दिलेल्या भेटीत पक्ष्यांचे जग उलगडले. नामशेषाच्या मार्गावरील पक्षी, नामशेष होण्यामागील कारणे, त्यांचे संरक्षण व संवर्धन, त्यासंदर्भातले कायदे, अंमलबजावणी अशा विविध विषयांची उकल त्यांनी केली. पक्ष्यांचा अधिवास हा त्याच्या संरक्षण व संवर्धनातील मोठा घटक आहे. संशोधन व अभ्यास यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, दुर्दैवाने अन्य देशाच्या तुलनेत भारतात याकडे दुर्लक्ष झाले आहे. यासाठी त्यांनी सिंगापूर, थायलंडचे उदाहरण दिले. धनेश पक्ष्याला वाचवण्यासाठी हॉर्नबिल रिसर्च फाऊंडेशन आणि सारावाक यांच्यात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉर्नबिल परिषदेत करार झाला. अशी पावले आपल्याकडे उचलली जात नाहीत. संकटग्रस्त पक्ष्यांसाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याच्यावतीने प्रजाती पुनप्र्राप्ती योजना (स्पिसिस रिकव्हरी प्लॅन) तयार केली जाते. त्याअंतर्गत काही विशिष्ट योजना सुद्धा आखल्या जातात, पण सातत्याअभावी याचा उपयोगच होत नाही. याबाबत डॉ. पिंपळापुरे यांनी माळढोक पक्ष्याचे उदाहरण दिले. प्रजाती पूनप्र्राप्ती योजनेंतर्गत या पक्ष्याच्या संरक्षण व संवर्धनाची धुरा हाती घेण्यात आली. वाघांना ज्याप्रमाणे कॉलर लावतात, तशी या पक्ष्याच्या पायाला रिंग लावण्यात आली. पुढे त्याचे काय झाले हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. आज हा पक्षी जवळजवळ संपल्यात जमा आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्याची चाहूल नाही. २०१० मध्ये त्याची चार घरटी सापडली. कदाचित पुढील पाच वर्षांत तो संपल्याचे जाहीर केले जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पक्षी, प्राण्यांच्या संरक्षण, संवर्धनासाठी वनखात्याकडे अनेक कायदे आहेत, पण त्याची अंमलबजावणी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. वनखात्याबरोबरच लोकसहभागसुद्धा तेवढाच आवश्यक असल्याचे ते म्हणाले. धनेशच्या प्रजाती कमी होत आहेत धनेशच्या काही प्रजाती नक्कीच कमी होत असल्याचे डॉ. पिंपळापुरे म्हणाले. जगभरात धनेशच्या ५४ ते ५७ प्रजाती आहेत. भारतात नऊ प्रजाती आणि विदर्भात चार प्रजाती आहेत. पर्यावरणातील बदल काही पक्ष्यांनी स्वीकारले असले तरीही या पक्ष्याने सवयी बदललेल्या नाहीत. प्रजनन काळात मादी धनेशला झाडाची ढोलीच लागते ज्यात तीन महिने ती राहते. हे लाखो वर्षांपासून सुरू आहे. फळांचा रस चाखल्यानंतर बिया फेकून देणाऱ्या या पक्ष्यांमुळेच नैसर्गिक जंगल वाढीस लागत आहे. मात्र, गेल्या ४० वर्षांत जंगल कमी झाल्याने या पक्ष्यांचा अधिवासही नष्ट झाला आहे. दहा वर्षांपूर्वी महाराजबागेत धनेशाची प्रजाती सापडली, पण त्यांचा अन्न आणि निवारा असलेले त्याठिकाणचे वड, पिंपळाचे वृक्ष जवळजवळ नाहीसे झाले आहेत. ढोलीतच प्रशिक्षण धनेश पक्ष्याची मादी विणीच्या हंगामात तब्बल तीन महिने झाडाच्या ढोलीत राहते. यावेळी धनेश पक्ष्याचा नर तिला चिखलाचे गोळे, झाडाची साल देतो. त्यातून ती ढोलीत भिंत उभारते. नर धनेश तिला वड, पिंपळाची फळेदेखील देतो. अंडी उबवल्यानंतर पिले थोडी मोठी होईपर्यंत मादी त्यांना ढोलीतच प्रशिक्षण देते आणि भिंत फोडून बाहेर येते. नंतर दोघे मिळून त्या पिलांना मातीचे गोळे, झाडाची साल देतात आणि पिले देखील त्यापासून ढोलीत भिंत उभारतात. धनेश पक्ष्याच्या विणीपासून तर पिले देण्यापर्यंतची प्रक्रिया डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी उलगडून दाखवली.