पुढारी होण्याचा राजमार्ग साखर कारखान्यातूनच जात असल्याने राज्यातील जलसंकटाला ऊस जबाबदार नसल्याचे सांगत शरद पवार यांनी साखर कारखानदारांची पाठराखण केली, असा आरोप ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच.एम. देसरडा यांनी केला. महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्यावतीने राज्यातील २० दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ांना भेट देऊन पाहणी केली जात आहे. यात मराठवाडय़ातील आठ आणि विदर्भातील सात जिल्ह्य़ांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील एकूण जलसाठय़ांपैकी ७० टक्के पाणी आजही सिंचनासाठी वापरले जाते. या पाण्यापैकी ८० टक्के पाणी उसाला जाते. याचाच अर्थ, राज्यातील एकूण पाण्यापैकी ६० टक्के पाणी ५० हजार हेक्टरवरील ऊस पिऊन टाकतो. ऊस हे राज्याचे मुख्य पीक नाही, तरीही उसाला राजाश्रय देण्याची धडपड पवारांनी केली. १०० कोटी जनतेला वर्षभर पुरेल एवढे पाणी एका मोसमातील उसाच्या पिकासाठी लागते. वास्तविक, यातून संपूर्ण राज्याची तहान भागवली जाऊ शकते, पण पवार ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत. साखर कारखाना म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याने राज्यात सद्य:स्थितीत ५० हजार हेक्टरवर उसाचे पीक घेतले जाते. या उसापाठोपाठच नेता, बाबू आणि थली हे त्रिकूट तयार झाले आणि या त्रिकुटाने संपूर्ण महाराष्ट्राचे वाटोळे केले. पवारांच्या राजकारणामागील ते गमक आहे. पैशाचा खेळ आणि खेळाचा पैसा करणे पवारांना चांगले जमते, असा टोला प्रा. देसरडा यांनी पवारांना हाणला. ऊस पिकाला ज्याप्रमाणे अधिक पाणी लागते, त्याचप्रमाणे वायनरी उद्योगाला लागते. राज्यात गहिरे जलसंकट असताना या उद्योगांची पाठराखण करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे प्रा. देसरडा म्हणाले.