रेल्वेचा अजब कारभार नागपूर : भारत डिजिटल इंडिया झाल्याचा दावा केला जातो. मात्र, रेल्वेसारख्या अत्याधुनिक प्रणाली देखील नीट काम करीत नसल्याचा अनुभव आला. एका ८१ वर्षीय महिलेला रेल्वेने अप्पर बर्थ दिला. तेथे चढणे शक्य होत नसल्याने महिलेने तिकीट रद्द केले, पण तिकिटाची रक्कम देखील रेल्वेने परत केली नाही. रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा आहे. प्रवास भाडय़ात सवलत आहे. तसेच त्यांना खालीलचे आसन (लोवर बर्थ) देणे बंधकारक आहे. असे असताना एका ८१ वर्षीय महिलेला अप्पर बर्थ देण्यात आले. विजय डबली या ८१ वर्षीय वृद्ध महिलेने नागपूहून जबलपूरला जाण्यासाठी १८ मार्च २०१९ ला आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून मुलाच्या मदतीने तिकीट खरेदी केली. त्यांना गाडी क्रमांक १२१५९ मध्ये एस-६ या डब्यात ३० आणि ३२ क्रमांचा बर्थ देण्यात आला. यात वयोवृद्ध महिलेला बाजूचे बर्थ देण्यात आले. ज्यावेळी हे बर्थ वितरित करण्यात आले. तेव्हा सुमारे १४० ते १४५ बर्थ रिकामे असल्याचे संकेतस्थळावर दिली जात होती. वरचे बर्थ मिळाल्याने तिकीट रद्द करण्यात आले, परंतु तिकिटाची रक्कम परत करण्यात आली नाही. परतीचे तिकीट गाडी क्रमांक १२१६० मध्ये केले असता असाच अनुभव आला. जेव्हा तिकीट खरेदी केले, तेव्हा १०४ बर्थ उपलब्ध असल्याची माहिती संकेतस्थळावर होती, परंतु वयोवृद्ध महिलेला बर्थ क्रमांक २७ देण्यात आला होता. फार्ममध्ये ज्येष्ठ नागरिक असे नमूद केले होते. असे असताना ज्येष्ठ नागरिकांना खालील बर्थ मिळत नसेल तर प्रणालीमध्ये तातडीने दुरुस्ती झाली पाहिजे, अशी मागणी या महिला प्रवाशांनी केली आहे.