स्त्री-पुरुष हे निसर्गत: भिन्न असले तरी मानवाच्या त्या दोन उपजाती आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे. मात्र, स्त्रियांना दुय्यम वागणूक दिल्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक व लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला. त्याकरिता संविधानात विशेष तरतुदी करण्यात आल्या. किंबहुना महाराष्ट्र राज्य महिलांविषयी कायदे करण्यात अग्रेसर आहे, हे कुणीही नाकारु शकणार नाही. त्यामुळेच राज्याने लैंगिक छळविरोधी कायदा करुन इतर राज्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. म्हणून सर्व महिलांनी शोषणाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड. विजया बांगडे यांनी केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने वनभवन येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विशाखा कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबलप्रमुख) ए.के. निगम होते. व्यासपीठावर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक(प्रशासन दुय्यम संवर्ग) डॉ. पी.एन. मुंडे, मुख्य वनसंरक्षक(मानव संसाधन व्यवस्थापन) यशवीर सिंह, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या समुपदेशक वर्षां पाटील, सुजाता लोखंडे, ‘यशदा’ पुणे येथील महिला सक्षमीकरण विभागाच्या सेवानिवृत्त विभाग प्रमुख जयश्री मुरुडकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी होत्या.देशात सुरुवातीपासून पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचा प्रभाव असल्यामुळे विविध स्तरावर महिलांचे शोषण होत आले आहे. त्यासाठी राजस्थानमधील भवरीदेवी अत्याचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने भवरीदेवीच्या बाजूने निर्णय दिला. यावेळी व्यापक कायद्याची आवश्यकता भासल्याने विशाखा निर्णयाच्या अनुषंगाने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळविरोधी कायदा-२००० अस्तित्त्वात आला. याचाच अर्थ संविधानातील अनुच्छेद १४ व १५ अन्वये सर्वाना जगण्याचा अधिकार दिल्याने महिलांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जयश्री मुरुडकर यांनी केले. ज्याप्रमाणे फुले दाम्पत्यांनी सर्व समाजाला शिक्षित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्याप्रमाणे कुटुंबातील आई ही महत्त्वाचा घटक असल्याने मुलामुलींना समान वागणूक दिल्यास समपातळी गाठण्यासाठी स्वत:च्या घरापासून सुरुवात केली पाहिजे, असे मत पूजा चौधरी यांनी व्यक्त केले. प्राणायाम, योगाभ्यास व सकाळी फिरणे तसेच भरपूर पाणी पिणे आरोग्यास हितकारक आहे. श्वासावर नियंत्रण मिळवून आहार, विहार, आचार, विचार या चतु:सुत्रीवर आपले जीवन व्यतित केल्यास निरामय आरोग्यासाठी लाभदायक ठरेल, असे वर्षां पाटील म्हणाल्या. क्षेत्रीय महिला अधिकारी व कर्मचारी यांनी क्षेत्रीय कार्यात आघाडीवर असून महिलांनी समन्वयाने समस्या सोडविण्यासाठी संकुचित स्वभावाच्या मानसिकतेतून बाहेर पडून प्रशासनात सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. पी.एन. मुंडे यांनी केले. ‘निरजा’ चित्रपट महिला शक्तीचे प्रतिक असून संविधानाला अभिप्रेत समानतेसाठी प्रत्येकाने तत्पर राहून समन्वय साधून कर्तव्य पार पाडले पाहिजे. किंबहुना स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या कार्य केल्यास गतिमान प्रशासन निर्माण होईल, असे ए.के. निगम म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप शेंडे व संचालन रुपाली खोब्रागडे यांनी केले. सुचिता राठोड यांनी आभार मानले.