बदल हवा म्हणून जनतेने युती सरकारला स्वीकारले, परंतु या सरकारने अपेक्षेप्रमाणे कोणताचा बदल केला नाही. उलट जनतेचे जिणे कठीण करण्याचे काम केले आहे. यामुळे सत्ता परिवर्तनाचा निर्धार केला असून संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या बहुतांश जागांवर निवडणूक लढणार आहे, असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विद्यमान सरकार शेठडी, भटजी, लाटजी व बाटजीचे असून यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी संभाजी ब्रिगेड शहाजीराजांच्या जन्मदिवसापासून राज्यभर स्वराज्य संकल्प अभियान राबवत आहे. युती सरकारमध्ये शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महिला सुरक्षित नाहीत. युवकांना रोजगार नाही, नोटबंदी, जी.एस.टी. सरकारपुरस्कृत बँक घोटाळे, धार्मिक उन्माद, सरकारी शाळा बंद करणे आदी बाबींमधून दशहत निर्माण केली जात आहे. भावनिक प्रश्न ऐरणीवर आणून जनतेचे हक्क, अधिकार नाकारण्याचे षडयंत्र सरकारचे आहे. या पाश्र्वभूमीवर लोकप्रबोधन करून सत्तापरिवर्तन घडवून आणण्यात येईल. या सरकारला सत्तेपासून दूर करण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष म्हणून पयार्य असल्याचा दावाही आखरे यांनी केला. स्वराज्य संकल्प अभियानात सरसकट कर्जमाफी मिळायला हवी, सर्वाना केजी टू पीजी सक्तीचे व मोफत शिक्षण तसेच देशभर एकाच दर्जाचा अभ्यासक्रम लागू करणे, देशभर आरोग्य सेवा नि:शुल्क उपलब्ध करणे, कंत्राटी नोकरभरती बंद करावी आणि शासकीय, निमशासकीय क्षेत्रातील नोकर भरतीवरील बंदी उठवणे आणि महिलांना सक्षम, सुरक्षित आणि सर्वच क्षेत्रात समान संधी मिळेल, अशी व्यवस्था करणे आदी मुद्दे लोकांसमोर मांडण्यात येतील. या प्रमुख मागण्यांवरच पुढील निवडणूक लढवण्यात येईल, असेही ते म्हणाले.