७६ पाणवठय़ांमधील गाळ काढला ३८ बंधारे व सात पाणवठे तयार राज्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असताना सर्वसामान्य जनतेला आता कुठे जलसंधारणाचे महत्त्व पटायला लागले आहे. मात्र, मध्य भारतातील सातपुडा पर्वतरांगांमधील लहान-थोर आदिवासी बांधवांचे हजारो हात कोणताही गाजावाजा न करता जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. मध्य भारतातील वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सातपुडा फाऊंडेशनच्या मार्गदर्शनात यंदा या आदिवासी बांधवांनी सुमारे ७६ पाणवठय़ांमधील गाळ साफ करून ३८ नवीन चेक बंधारे व सात नवीन पाणवठे तयार करण्याचा विक्रम केला. मध्य भारतात दर चार वर्षांनी दुष्काळ पडतो. महाराष्ट्र व मध्यप्रदेशात विस्तारलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्येही पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. त्यामुळे २००५ साली जलसंधारणाची लोकचळवळ राबवण्यास सुरुवात झाली. प्रामुख्याने व्याघ्र प्रकल्पांमधील बफर क्षेत्रातील गावांना सोबत घेऊन या गावांशेजारी असणाऱ्या जंगलामध्ये, नाल्यामध्ये बांध बांधणे, बंधाऱ्यातील साचलेला गाळ नोव्हेंबर महिन्यानंतर उपसून त्यांना खोल करणे, नवीन पाणवठे तयार करणे अशी कामे हाती घेतली. सुरुवातीला संख्येने कमी वाटणारी कामे गेल्या ११ वर्षांत मोठय़ा संख्येने होऊ लागली. यंदा तर या कामांनी उच्चांक गाठला आणि आदिवासी बांधवांनी ७६ पाणवठय़ांमधील गाळ साफ करून ३८ नवीन चेक बंधारे व सात नवीन पाणवठे तयार केले, अशी माहिती सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी दिली. यंदा गावातील ४५ हातपंपामधून वाया जाणारे पाणी ४५ शोष खड्डे करून मुरवले. यामुळे जलसंधारणासोबतच गाव स्वच्छताही झाली. तसेच चिखल व पाणी पाहून गावात घुसणाऱ्या वन्यप्राण्यांमुळे उभा राहणारा मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासही मदत झाल्याचे सहाय्यक संचालक अनुप अवस्थी यांनी सांगितले. सातपुडा पर्वतरांगांमधील जलसंधारणाची लोकचळवळ अनेकांना प्रेरणादायी ठरावी अशीच आहे.