|| शफी पठाण लेखक डॉ. सतीश तराळ यांचा खळबळजनक आरोप; अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून मागे न हटण्याचा निर्धार नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मला प्रचंड त्रास दिला जात आहे. मी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मला धमक्यांचे फोन येत आहेत, असा थेट आरोप प्रसिद्ध लेखक डॉ. सतीश तराळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. विदर्भ साहित्य संघाची निवडणूक कधी नव्हे इतकी यावेळी गाजत आहे. प्रत्येकदा मर्जीतल्याच लोकांना कार्यकारिणीत घेऊन व पद्धतशीर निवडणूक टाळून विरोधकांचा आवाज दडपला जात असल्याचा आरोपही काही सदस्यांनी केला आहे. यावेळची निवडणूकही फिक्स असून अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले डॉ. सतीश तराळ हे डमी उमेदवार असल्याचीही टीका झाली. या टीकेचा खरपूस समाचार घेत डॉ. तराळ यांनी विदर्भ साहित्य संघावर अतिशय खळबळजनक आरोप केले. ते म्हणाले, २००६ ते आता २०२१ असा मागील १५ वर्षांपासून मी सतत अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय. पण, प्रत्येकवेळी माझा प्रयत्न हाणून पाडला जातो. निवडणुकीचा खर्च संघाला परवडणारा नाही, तुम्ही तुमचा अर्ज परत घ्या, असे सांगून माझ्यावर दबाव निर्माण केला जातो. उमेदवारी अर्जासोबतच विड्रॉल अर्ज घेतला जातो. ज्या साहित्य संघात लोकशाहीवर भाषणे होतात तिथेच लोकशाहीची मूल्ये अशी पायदळी तुडवली जातात. माझा या कृतीला विरोध आहे. म्हणूनच यावेळी मी सर्व दबाव झुगारून निवडणुकीच्या मैदानात कायम राहण्याचे ठरवले आहे. मी कदाचित या निवडणुकीत पराभूतही होईल. परंतु माझी उमेदवारी प्रतीकात्मक आहे. ज्यांना ज्यांना साहित्य संघापासून लांब ठेवले गेले त्या सर्वांचे ही उमेदवारी प्रतिनिधित्व करणार आहे. परंतु, भविष्यात कुठलेच आव्हान उभे राहू नये म्हणून मला या निवडणुकीपासून परावृत्त केले जात आहे. त्यासाठी धमक्यांचे फोन येत आहेत. ऐकणार नसाल तर तुमचा साहित्य क्षेत्रातील प्रभाव संपवून टाकू, कुठल्याही संमेलनांना बोलावणार नाही, अशा शब्दात माझ्यावर दबाव निर्माण केला जात आहे. अखेर कंटाळून मला माझा फोन बंद करावा लागला, इतका हा त्रास असह्य होतोय, असेही डॉ. तराळ यांनी सांगितले. कोण आहेत डॉ. सतीश तराळ? डॉ. सतीश तराळ हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे राहणारे आहेत. ४० वर्षांपासून सातत्याने कथा, कविता, समीक्षात्मक लिखाण करीत आहेत. त्यांची १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना राज्य पुरस्कारासह विविध महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सर्व संस्थांमध्ये निवडणूक, येथे का नाही? सर्व साहित्य संस्थांमध्ये निवडणुका होत आहेत. गोव्याची निवडणूक नुकतीच झाली. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत निवडणुकीच्या मुद्यावरून खडाजंगी झाली. तिथे असे घडू शकले, कारण या संस्थांमध्ये लोकशाही आहे. तिथे निवडणुका होतात. मग, विदर्भ साहित्य संघालाच निवडणुकीचे वावडे का, असा प्रश्नही डॉ. तराळ यांनी उपस्थित केला.