शाळांमधून घेतल्या जाणाऱ्या शिबिरांना जाण्यास टाळाटाळ

शाळेला सुट्टय़ा लागल्याने मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी महिलांनी उन्हाळी शिबिरांची शोधाशोध सुरू केली आहे. उन्हाळा आणि शिबीर एक समीकरण झाले असून शाळांना सुट्टय़ा लागण्यापूर्वीच नोकरदार महिलांनी उन्हाळी शिबिरांना भेटी देणे सुरू केले आहे. शाळांसाठी १० एप्रिल ही शेवटची तारीख असून येत्या २६ जूनला विदर्भातील  शाळा शिरस्त्याप्रमाणे सुरू होतील. तोपर्यंत मुलांना कुठे गुंतवून ठेवायचे या विचारात असलेल्या महिला मात्र, कुठल्याही शिबिरात मुलांना दाखल करण्यास तयार नाहीत.

तर मुलांचे वय, त्यांच्या आवडी निवडी, शिबिरात येणाऱ्या मुलांची संख्या, शिबिराच्या ठिकाणी असलेली सुरक्षितता, मुलांच्या शी-शूची सोय अशा सर्व गोष्टी तपासूनच महिला शिबिरात पाठवायला तयार होतात, हे विशेष. पण, हल्ली शाळेतूनही शिबिरे घेतली जात आहेत. मात्र, शाळांमधून घेतल्या जाणाऱ्या शिबिरांना विद्यार्थी जाण्याचे टाळतात, असेही दिसते.

साधारणत: घराशेजारी आणि सकाळची वेळ  असलेल्या शिबिरांसाठी महिला पसंती देतात. एकतर शाळेलाही सुट्टी आणि खासगी शिकवणी वर्गही बंद, त्यामुळे दिवसभर घरी दंगामस्ती, टीव्ही, सामानांची फेकाफेक आणि आरडाओरड करण्यापेक्षा शिबिरात अडीच-तीन तास मुलगा, मुलगी गुंतून राहील, असे त्यांचे गणित आहे. केजी- १ किंवा केजी- २ च्या मुलांसाठी अभ्यासाचा ताण नको तर त्यांना मनोरंजन आणि खेळ जास्त हवा तसेच मुलांचे उच्चार सुधारणे, त्यांच्याकडून त्यांचीच पुस्तके वाचून घेणे, ‘क्राफ्ट’ आणि ‘कस्यरूू रायटिंग’ची अपेक्षाही महिलांकडून केली जात असल्याने चोखंदळ पालक उन्हाळी शिबिरांप्रती जास्तच जागृत असल्याचे दिसून येते.

मोठय़ा वयोगटातील  म्हणजे आठ वर्षांवरील मुलांसाठी कराटे, स्केटिंग, मुष्टियुद्ध, तायक्वांडो, क्रिकेट, चित्रकला, नृत्य, पाककला अशी अनेक शिबिरे असून त्यांची नोंदणी सुरू  झाली आहे. साधारणत: ६०० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंत उन्हाळी शिबिरांचे तीन महिन्यांसाठीचे दर आहेत.

मी शाळेत काम करते. आता सुट्टय़ा आहेत आणि मुलांकडे भरपूर वेळ आहे. त्यासाठी मी आणि माझी जाऊ  शिबिरांची चौकशी करीत आहोत. त्यांच्या शिकवणी वर्गालाही सुट्टी लागली असून हे अडीच-तीन महिने त्यांना कुठेतरी गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. मात्र, अभ्यासाव्यतिरिक्त मनोरंजनातून इतर काही शिकण्याची संधी त्यांना मिळावी, अशीच शिबिरे आम्ही शोधत आहोत. अभ्यास एके अभ्यास टाळून मुलांना कस्र्यू लिहायला शिकवणे, मराठी हिंदी किंवा इंग्रजी कविता म्हणून घेणे, नृत्य, क्राफ्टिंग शिकवावे, अशी अपेक्षा आहे.

      – रेणुका ठकरे,  नंदनवन

पोलीस क्वार्टरमधील मुले उन्हाळी शिबिरांना जातच नाहीत. प्रत्येकवर्षी शाळेत प्रवेश घेतानाच उन्हाळी शिबिरांसाठी २०० रुपये घेतले जातात. मात्र, मुले जातच नाहीत. त्यापेक्षा मुलांना त्यांच्या मनाने खेळायला आवडते. तेच त्यांच्या वयोगटाची मुले निवडतात आणि क्रिकेट खेळतात. त्यांना कुठल्याही उन्हाळी शिबिराची गरज वाटत नाही. मात्र, हल्ली उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली पालकांकडून शाळाही पैसे लुटतात, याचे आश्चर्य वाटते, पण नाईलाज आहे.

      – राखी मेश्राम,  कुकडे लेआऊट